हुतात्मा दिनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत बेळगावच्या नगरसेवकांचा अभिनंदनाचा ठराव संमत
खानापूर : 1 जून 1986 च्या आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी खानापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे. शिवस्मारक येथे झालेल्या बैठकीत विविध ठराव संमत करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळ देसाई होते. प्रास्ताविक व स्वागत आबासाहेब दळवी यांनी केले. बेळगाव महापालिकेत मराठी भाषेबद्दल आवाज उठविणारे नगरसेवक रवि साळुंखे, मंडोळकर आणि सुधा भातकांडे यांचा अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. तसेच कन्नड संघटनांच्यावतीने मराठी भाषेविरोधात कठोर भूमिका घेत आहेत. या विरोधात आवाज उठविण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती जो निर्णय घेईल, त्याला खानापूर तालुका समितीचा पाठिंबा जाहीर करण्यात आला.
तसेच तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने आणि इतर सदस्यांशी संपर्क साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुमित्रा पवार, विरोधी पक्षनेते यांच्याशी विचारविनिमय करून मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानासमोर धरणे आंदोलन कार्यक्रम घेण्यात यावा, असे ठरविण्यात आले. बैठकीला प्रकाश चव्हाण, अॅड. केशव कळेकर, मारुती परमेकर, राजाराम देसाई, नागेश भोसले, रमेश धबाले, पांडूरंग सावंत, जयराम देसाई, गोपाळ पाटील, बाळासाहेब शेलार, अमृत शेलार, अजित पाटील, संजीव पाटील, रविंद्र शिंदे, मऱ्याप्पा पाटील, कृष्णा मन्नोळकर, नारायण पाटील, मोहन गुरव, बी. बी. पाटील, जयसिंग पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, एस. एच. गुरव, पुंडलिक पाटील, संदेश कोडचवाडकर, रणजित पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.