बांगलादेशमध्ये पुन्हा हिंदूची हत्या
वृत्तसंस्था / ढाका (बांगला देश)
बांगलादेशात पुन्हा एका हिंदू माणसाची हत्या करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यांमधील ही तिसरी हिंदू माणसाची हत्या आहे. या व्यक्तीला कपड्यांच्या कारखान्यात गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला असे कारण देण्यात आले आहे. त्याच्यावर त्याच्याच सहकाऱ्याच्या बंदुकीतून अपघाताने गोळीबार झाला, असे बांगलादेश पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, हे म्हणणे कितपत खरे आहे, यावर संशय व्यक्त केला जात असून ही देखील हेपुपुरस्सर केलेली हत्याच असावी, असे मृताच्या कुटुंबीयांचे आणि सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हत्येही ही नवी घटना सुलताना स्वेटर्स लिमिटेड या कारखान्यात घडली. हे ठिकाण म्यामेनसिंग भागातील मेहरबारी येथे असल्याची माहिती देण्यात आली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव बजेंद्र बिस्वास असे असून त्याची नियुक्ती या कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून करण्यात आली होती. त्याचा दुसरा सहकारी नोमन मियां हा असून त्याच्या बंदुकीतून उडालेल्या गोळीने बिस्वास याचा प्राण घेतला. मियां याच्या बंदुकीतून अपघाताने गोळी उडाली, असा दावा करण्यात येत आहे. मिया याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.
20 रक्षकांसमक्ष...
ही घटना घडली तेव्हा या कारखान्यात 20 सुरक्षा रक्षक सेवेवर होते. बिस्वास आणि मिया हे दोघे एकमेकांच्या शेजारी बसलेले होते. त्यावेळी मिया याच्या बंदुकीतून अपघाताने गोळी उडाली. ती बिस्वास याच्या डाव्या मांडीत घुसली. तो गंभीर जखमी झाला आणि त्याच्या जखमेतून रक्तस्रावही मोठ्या प्रमाणात झाला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला त्वरित उपचारांसाठी रुग्णालयात नेले. तथापि, रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनीही तो पर्यंत मिया याला अटक केली होती. तथापि, ही नंतर रचून सांगण्यात आलेली कथा आहे, असे बिस्वास याच्या मित्रांचे म्हणणे आहे. बिस्वासचीही हत्याच झाली असून या गुन्ह्यावर पांघरुण घालण्यासाठी अपघाताचे नाटक करण्यात आले आहे, असे त्याच्या कुटुंबीयांचेही म्हणणे आहे. पाठोपाठ घडलेल्या या तीन घटनांमुळे बांगलादेशातील हिंदू समाज अधिकच भयभीत झाला असून हिंदू संघटनांनी प्रतिकाराची सज्जता ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
कायदेशीर कारवाई होणार
या प्रसंगात अटक करण्यात आलेल्या मिया याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ही घटना अपघातामुळे घडली, की ही हेतुपुरस्सर केलेली हत्या होती, या प्रश्नाचीही चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणाची प्रामाणिकपणाने चौकशी करून सत्य बाहेर काढले जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.