अयोध्या सोहळ्यानंतर भाजपकडून उमेदवारांची घोषणा?
भाजपकडून नवा नारा : दोन दिवसीय बैठकीचे आयोजन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीला आता काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. याचदरम्यान हिंदीभाषिक पट्ट्यातील तीन राज्यांमध्ये मिळालेल्या मोठ्या विजयामुळे उत्साह वाढलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी पक्षनेत्यांसोबत चर्चा केली आहे. भाजपकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच उमेदवार जाहीर केले जाणार असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच सुरू होणार आहे. उमेदवारांची पहिली यादी जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात समोर येऊ शकते. 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर भाजपकडून हे पाऊल उचलले जाऊ शकते.
भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच उमेदवारांची यादी जाहीर केली होती. अशाप्रकारच्या निर्णयामुळे उमेदवारांना प्रचारासाठी मोठा वेळ मिळतो असे पक्षाचे म्हणणे आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला या धोरणाचा फायदा झाला होता असे मानले जातेय. लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने नवा नारा तयार केला आहे, ‘सपने नहीं हकीकत बुनते हैं, इसलिए तो सब मोदी को चुनते हैं’ असा हा नारा असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दिल्लीत शुक्रवारपासून भाजप पदाधिकाऱ्यांची दोनदिवसीय बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केले आहे. यात पक्षाध्यक्ष जगतप्रकाश न•ा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश प्रभारी, सहप्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश महामंत्री संघटन उपस्थित होते. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर समीक्षा करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंबंधी यात विशेष चर्चा झाली आहे.
राम मंदिर सोहळ्याची पार्श्वभूमी
पंतप्रधान मोदी हे भाजप पदाधिकाऱ्यांना राम मंदिर सोहळ्यासंबंधी मोठे अभियान राबविण्याचा मंत्र देऊ शकतात. आगामी निवडणुकीत हा मोठा मुद्दा ठरू शकतो. रामलल्लाचे मंदिर सर्वसामान्यांसाठी 23 जानेवारीपासून खुले होणार असल्याने पंतप्रधान मोदी हा मुद्दा प्रत्येक नागरिकापर्यंत नेण्याचे आवाहन करू शकतात. प्रत्येक बूथपर्यंत हा संदेश पोहोचविण्यासाठी विशेष योजना तयार केली जाऊ शकते. 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी हे अयोध्येतील श्रीराम विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत.
निवडणूक तयारीला अंतिम स्वरुप
आगामी निवडणुकीपूर्वी होणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची ही दोन दिवसीय बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. विरोधी पक्षांची आघाडी आणि जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पाहता भाजपचे नेते या बैठकीत विचार मांडू शकतात. तसेच या बैठकीत भाजप स्वत:च्या निवडणूक तयारीच्या दिशेला अंतिम स्वरुप देऊ शकतो.