Sangli news | शेतकरी आक्रमक झाले, कार्यालयाला कुलूप ठोकले अन्...; खंडेराजुरी तलाठी कार्यालयात नेमकं काय घडलं?
खंडेराजुरी : शेतकऱ्यांच्या संमत्तीशिवाय सहापैकी तीन रस्त्यांची पाणंद रस्त्यासाठी चुकीची नोंद घातल्याचा आरोप करत खंडेराजुरी (ता. मिरज) येथील संतप्त शेतकऱ्यांनी तलाठी सचिन पाटील यांना कार्यालयात दोन तास कोंडून घातले. सर्व्हेक्षणाशिवाय अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी तलाठ्याने मनमानी कारभार केला. मात्र, ग्रामस्थ आक्रमक होताच तलाठ्याची बोलती बंद झाली.
या प्रकारामुळे जिल्हाभरातील तलाठी कामगारांमध्ये खळबळउडाली असून, खंडेराजूरी ग्रामस्थांच्या आक्रमक आंदोलनाची तालुक्यात चर्चा होती. माहिती अशी, खंडेराजुरीत शेतकऱ्यांनी व ग्रामपंचायतीने २९ पाणंद रस्ते सुचवले होते.
पण तलाठ्याने फक्त २० नोंदी आल्याचे सांगितले. त्यातील सहा पाणंद रस्त्याच्या नोंदी केल्या. पण सदर नोंदी करताना शेतकऱ्यांना नोटीस न देता, त्यांची संमती न घेता, रस्त्याचीप्रत्यक्ष पाहणी न करता, ड्रोन सर्वे झाला नसताना एकाच गटात दोन रस्ते तलाठ्याने चुकीचा अहवाल दिला. नोंदणीकृत सहा पाणंद रस्त्यापैकी तीन रस्त्यांची चुकीची नोंद केल्याचे समोर आले आहे.
तलाठ्याच्या मनमानी कारभाराचा प्रकार लक्षात घेताच शेतकऱ्यांनी तहसीलदारांना भेटून तक्रार केली होती. तलाठी कार्यालयाची चूक लक्षात येताच तलाठ्यांना कुलूप घालून दोन तास कोंडून घातले. शेतकऱ्यांनी तुमची चूक आहे. तुम्हीच दुरुस्त करा. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांनी न्यायालयात हेलपाटे मारायचे का, असा सवाल करण्यात आला. यावेळी विजय चव्हाण, बबन पाटील, संभाजी चव्हाण, गणेश पाटील, तुकाराम पाटील, सुभाष पाटील, अजित पाटील, शामराव पाटील, संदीप पाटील, वसंत पाटील यांच्यासह ५० हून अधिक शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन तलाठ्यांना कार्यालयातच दोन तास कोंडून घातले.