पंतप्रधान मोदी अन् राहुल गांधींना खुल्या चर्चेचे निमंत्रण
सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांनी केली मागणी : जनतेला होणार लाभ
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशातील प्रसिद्ध व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खुल्या चर्चेचे निमंत्रण दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन लोकूर, दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश अजित शाह आणि एन. राम यांच्याकडून दोन्ही नेत्यांना खुल्या चर्चेसाठी निमंत्रण पाठविण्यात आले आहे. एका जाहीर चर्चेच्या माध्यमातून आमच्या राजकीय नेत्यांना थेट ऐकण्याची संधी मिळाल्यास नागरिकांना अत्याधिक लाभ मिळणार आहे. यामुळे आमच्या लोकशाही प्रक्रियेला अत्यंत मजबूत करण्यास मदत मिळणार असल्याचे या प्रसिद्ध व्यक्तींनी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. माजी न्यायाधीश मदन लोकूर, अजित शाह आणि वरिष्ठ पत्रकार एन. राम यांच्याकडून दोन्ही नेत्यांना पत्र लिहिण्यात आले आहे. स्वत:च्या विविध क्षमतांद्वारे देशाबद्दल तुम्ही स्वत:चे कर्तव्य बजावले आहे. आम्ही तुमच्यासमोर मांडत असलेला प्रस्ताव पक्षपातपूर्ण नसल्याचे आमचे मानणे आहे. तसेच हा प्रस्ताव प्रत्येक नागरिकाच्या व्यापक हिताचा आहे. 18 व्या लोकसभेची निवडणूक सध्या मध्य टप्प्यात पोहोचली आहे. सभा आणि रॅलींदरम्यान सत्तारुढ पक्ष भाजप तसेच मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस दोन्हींच्या सदस्यांनी आमच्या घटनात्मक लोकशाहीच्या मूळस्वरुपाशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले असल्याचे या पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना उद्देशून सांगण्यात आले आहे.
मोदी अन् खर्गेंच्या वक्तव्यांचा उल्लेख
पंतप्रधानांनी आरक्षण, कलम 370 आणि संपत्ती पुनर्वितरणावर काँग्रेसला जाहीरपणे आव्हान दिले. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी घटना, इलेक्टोरल बाँड स्कीम आणि चीनबद्दल सरकारच्या भूमिकेवर पंतप्रधानांना प्रश्न विचारले आहेत. तसेच खुल्या चर्चेचे आव्हानही दिले आहे. दोन्ही पक्षांनी स्वत:च्या घोषणापत्रांसोबत सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावरील भूमिकेसंबंधी परस्परांना प्रश्न विचारले असल्याचे पत्रात नमूद आहे.
आरोप-प्रत्यारोपांवर चिंता व्यक्त
जनतेचा सदस्य म्हणून आम्हाला दोन्ही पक्षांकडून केवळ आरोप आणि आव्हानं ऐकायला मिळाली आणि कुठलीच सार्थक प्रतिक्रिया दिसून आली नसल्याने आम्ही चिंतेत आहोत. सध्याच्या डिजिटल जगात चुकीची माहिती, खोटी वक्तव्यं आणि फेरफाराची वृत्ती दिसून येते. अशा स्थितीत जनतेला चर्चेच्या सर्व पैलूंविषयी चांगल्याप्रकारे शिक्षित केले जावे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे पत्रात म्हटले गेले आहे.
खुली चर्चा ठरणार उदाहरण
संबंधित मुद्द्यांवर दोन्ही देशांकडून खुली चर्चा करण्यात यावी, यामुळे जनतेला अनेक लाभ होणार असल्याचे आमचे मानणे आहे. दोन्ही नेत्यांचे विचार थेट ऐकून कुणाला स्वत:चे समर्थन द्यावे याचा निर्णय जनता घेऊ शकणार आहे. यामुळे राजकीय जागरुकता देखील वाढेल आणि लोक अधिक माहितीसोबत मतदान करू शकतील. भारतात जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असून पूर्ण जग आमच्या निवडणुकीकडे उत्सुकतेने नजर ठेवून असते. याचमुळे अशाप्रकारची खुली चर्चा एक मोठे उदाहरण ठरणार असल्याचे पत्राद्वारे म्हटले गेले आहे.