अमित शहांना इतिहासाची जाणीव नाही; शहा वक्तव्य केवळ भ्रम पसरविण्यासाठी
राहुल गांधी यांचे केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे कौतुक केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना इतिहासाची जाणीव नाही. पंडित नेहरूंनी भारतासाठी स्वत:चे पूर्ण आयुष्य वाहिल्याचे वक्तव्य राहुल यांनी मंगळवारी केले आहे.
पंडित नेहरू हे देशासाठी अनेक वर्षे तुरुंगात होते. गृहमंत्री अमित शहा यांना कदाचित इतिहासाचे ज्ञान नसावे. शहा केवळ भ्रम पसरविण्यासाठी वक्तव्ये करत आहेत. शहा यांना इतिहास माहित असावा अशी अपेक्षा मी करू शकत नाही, कारण त्यांना इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची सवय असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
मूळ मुद्दा जातनिहाय जनगणना, भागीदारी आणि देशाचा निधी कुणाच्या हातात जातोय हा आहे. या मुद्द्यावर हे लोक चर्चा करू इच्छित नाहीत. या मुद्द्यावरील चर्चेला ते घाबरत असल्याने पळ काढत आहेत. परंतु आम्ही हेच मुद्दे लावून धरणार आहोत आणि गरीबांना त्यांना हक्क मिळवून देणार आहोत असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
ओबीसींची किती भागीदारी आहे? पंतप्रधान मोदी हे ओबीसी आहेत, परंतु सरकारला 90 अधिकारी चालवत असून यातील केवळ 3 जण ओबीसी असून त्यांना कोपऱ्यातील ऑफिस देण्यात आले आहे. सरकारच्या व्यवस्थेत ओबीसी, दलित आणि आदिवासींची किती भागीदारी आहे हा मुख्य मुद्दा आहे, ही बाब भागीदारीची असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
अमित शहा यांनी सोमवारी संसदेत जम्मू-काश्मीरशी संबंधित दोन दुरुस्ती विधेयकांवर स्वत:ची भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. नेहरू यांच्या अनेक चुकांमुळे काश्मीरच्या लोकांना 70 वर्षांपर्यंत त्रास सहन करावा लागला आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्याच्या स्थितीत असताना नेहरूंनी युद्धविराम जाहीर केला. सैन्याला आणखी दोन दिवसांची मुदत मिळाली असती तर पूर्ण काश्मीर आज भारतात असते असे उद्गार शहा यांनी काढले होते.