अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले खडेबोल
पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्याचे निर्देश : भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला पाठिंबा
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना खडेबोल सुनावले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चा झाली असून पहलगाम हल्ल्याचा पाकिस्तानने निषेध करावा, असे अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानने भारताला मदत करावी, असेही अमेरिकेने ठणकावले आहे.
भारत आणि पाक यांच्यात तणाव वाढलेला असताना अमेरिका दोन्ही देशांवर लक्ष ठेवून आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी अमेरिकन समकक्ष मार्को रुबियो यांच्याशी नुकतीच चर्चा केली. यादरम्यान, जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत भारत व पाकमधील वाढत्या तणावाबद्दल चर्चा झाली. परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी यासंबंधी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. ‘अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्यासोबत पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा केली. या चर्चेवेळी गुन्हेगार, समर्थक व नियोजन करणाऱ्यांना भारत योग्य अद्दल घडवेल’ असे सांगण्यात आल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या कठीण काळात भारताला उघडपणे पाठिंबा दिला आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत उभा आहे, असेही मार्को रुबियो यांनी सांगितले. दुसरीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पहलगाम हल्ल्यावरून अमेरिकेशी चर्चा केली. यावेळी अमेरिकेने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना खडेबोल सुनावले. पहलगाम हल्ल्याच्या चौकशीत पाकिस्तानने सहकार्य करावे, असे अमेरिकेकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे. हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करणे आणि दोषींना शिक्षा करणे ही पाकची जबाबदारी आहे, असेही अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. बुधवारी रात्री उशिरा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. यांच्याशी चर्चा केली. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी झालेल्या स्वतंत्र चर्चेत अमेरिकेचे दहशतवादाविरुद्धचे धोरण स्पष्ट करण्यात आले.
भारताच्या कारवाईची चांगलीच धास्ती पाकनने घेतली आहे. त्याचा परिणाम पाकिस्तान शेअर बाजारावर दिसून आला. बुधवारी पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळला होता. 3,200 अंकांना पाकिस्तान शेअर बाजार घसरला होता. पाकिस्तानचे मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी भारत हल्ला करणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद शेअर बाजारात दिसले. संयुक्त राष्ट्रसंघाने भारत आणि पाकिस्तान दरम्यान मध्यस्थीचा प्रयत्न केला. दोन्ही देशांनी संघर्ष टाळावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाने केले आहे.