Ambolgad : ‘स्वराज्य अन् पराक्रमाची’ साक्ष देणाऱ्या आंबोळगड संवर्धनासाठी पुढाकार कधी?
झाडा-झुडपांचाही किल्ल्याला वेढा पडलेला आहे
राजापूर : तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना नदीच्या मुखाजवळ आणि मुसाकाजी बंदराच्या परिसरात आंबोळगड येथे बांधण्यात आलेला किल्ले आंबोळगड छत्रपती शिवाजी महाराराजांच्या ‘स्वराज्य अन् पराक्रमाची’ आजही साक्ष देत आहे. लगतच्या नाटे येथील घेरायशवंतगड किल्ल्याची डागडुजी आणि संवर्धन होत असताना किल्ले आंबोळगड मात्र डागडुजीसह जतन आणि संवर्धनाच्या वर्षानुवर्षे प्रतीक्षेत राहिला आहे.
आंबोळगड येथे एसटी थांब्याच्या येथे एका उंच भागावर असलेल्या किल्ल्याचे जुने बांधकाम, पाण्याची टाकी, बुरुजाचे अवशेष, तटबंदी अन् त्या ठिकाणी असलेली तोफ किल्ल्याच्या पाऊलखुणांची साक्ष देतात. समुद्रसपाटीपासून काही मीटर अंतरावर बांधण्यात आलेल्या किल्ला आंबोळगडची तटबंदी पुरती ढासळली आहे. झाडा-झुडपांचाही किल्ल्याला वेढा पडलेला आहे.
या किल्ल्याचे बांधकाम नेमके कोणी केले आणि कधी झाले याबाबत ठोस माहिती सद्यस्थितीमध्ये उपलब्ध नाही. सुमारे 1200 चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये विस्तारलेल्या या किल्ल्याच्या दक्षिणेस समुद्र आहे. तर किल्ल्याच्या उत्तरआणि पश्चिमेस खंदक खोदलेले असून अस्पष्टरीत्या ते बुजलेल्या स्थितीमध्ये आहेत. किल्ल्याची तटबंदी पुरती ढासळलेल्या स्थितीमध्ये असली तरी, एकमेकांवर चिरे रचून सुमारे 10 ते 15 फुट उंचीची तटबंदी उभारल्याचा बांधकामावरून अंदाज येतो.
किल्ल्याच्या उद्ध्वस्त प्रवेशव्दारातून गडामध्ये प्रवेश करतांना उजव्या बाजूला एक बुऊज तर, प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला भिंत आहे. त्यापुढे असलेला बुरुज पूर्णपणे ढासळलेला आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर शत्रूने थेट मारा करता येऊ नये म्हणून अशी त्याठिकाणी बांधकामाची रचना दिते. किल्ल्यामध्ये शिरल्यानंतर, मध्यभागी एक मोठे वडाचे झाड असून या झाडासमोर एक तुटलेली तोफ असून झाडामागे आयताकृती विहीर आहे.
विहिरीच्या समोर आणि बाजूला दगडी पाण्याचे पात्र असून विहिरीच्या उजव्या बाजूला उद्ध्वस्त वास्तू दिसते. या किल्ल्याच्या परिसरामध्ये स्वयंभू श्री गणेश मंदिर, जागृत श्री महापुरुष देवस्थान, स्वयंभू श्री जटेश्वर देवस्थान आहेत. तर समोर विस्तीर्ण असा शांत आणि निळाशार पाण्याचा समुद्र किनारा आहे.