पर्वरीतील आंबेडकर भवन पुढील काही वर्षात : सुभाष फळदेसाई
पणजी : पर्वरीतील आंबेडकर भवन पुढील काही वर्षात उभे करण्याचे आश्वासन समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिले आहे. अखिल गोवा दलित महासंघातर्फे पाटो पणजी येथील कला संस्कृती खाते सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, स्वत:च्या समाजात दरी निर्माण न करता संघटित रहावे आणि इतरांना संघटित करावे. त्यातूनच समाजाचा विकास साधणे शक्य आहे. एक काळ असा होता की जातीयता फोफावली होती. दलितांवर अन्याय अत्याचार व्हायचे. त्याच काळात आंबेडकरांनी शिक्षण- बुध्दिमत्ता वापरुन जनजागृती केली. ज्ञानाचा प्रकाश टाकला आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलोल्या भारत देशाचे संविधान त्यांनी लिहिले. त्यानुसार देशाचा कारभार चालतो. आंबेडकरांचे विचार तत्त्वे आजही महत्वपूर्ण असून त्यांचे आचरण करुन पुढे जाणे आवश्यक आहे. आपल्या मंत्रीपदाच्या काळात आंबेडकर भवन पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्याचा पाठ पुरावा करण्यात येत आहे. भवन म्हणजे विद्या भक्तीचे मंदिर बनविण्यात येणार असून ते वर्षभर सर्वांसाठी खुले ठेवण्यात येणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले. दलित समाज सर्वच बाबतीत विकास साधत आहेत. बाबासाहेब यांचे विचार आत्मसात करुन मार्गक्रमण करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. त्यावेळी अनुसूचित जाती- जमाती आयोगाचे अध्यक्ष दीपक करमळकर, पेडणे नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, प्रमुख पाहुणे दयानंद म्हैत्तर व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांचीही थोडक्यात भाषणे झाली.