मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा थांबवली
बालटाल, पहलगाम हे दोन्ही मार्ग नादुरुस्त : यंदा 4.10 लाख भाविकांनी घेतले दर्शन
वृत्तसंस्था/ अमरनाथ
काश्मीरमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. यात्रा 9 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार होती, परंतु मुसळधार पावसामुळे रस्ते खराब झाल्याने रविवार, 3 ऑगस्टपासून थांबवण्याचा निर्णय शनिवारी जाहीर करण्यात आला. पावसामुळे यात्रामार्गांचे बरेच नुकसान झाले आहे. बालटाल आणि पहलगाम हे दोन्ही मार्ग नादुरुस्त झाल्याने यात्रा आठवडाभर आधीच थांबवावी लागत आहे, असे काश्मीर विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी सांगितले. नादुरुस्त झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाईल. सद्यस्थितीत रस्त्यांवर सतत यंत्रसामग्री आणि कर्मचारी तैनात असल्याने यात्रा पुन्हा सुरू करणे शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यंदा 3 जुलै रोजी सुरू झालेली अमरनाथ यात्रा 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी संपणार होती. मात्र, नैसर्गिक आपत्तींमुळे ते लवकर थांबवावी लागली. यावर्षी आतापर्यंत 4.10 लाख भाविकांनी अमरनाथ गुहेचे दर्शन घेतले आहे, तर गेल्यावर्षी 5.10 लाखांहून अधिक भाविक अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचले होते. अमरनाथ यात्रेदरम्यान 3 जुलै रोजी सकाळी बाबा अमरनाथची पहिली आरती करण्यात आली. त्या दिवसापासून ही यात्रा फक्त 1 महिना चालली. यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी सुमारे 50,000 सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले होते.
2024 मध्ये ही यात्रा 52 दिवसांची होती. तर 2023 मध्ये ही यात्रा 62 दिवस, 2022 मध्ये 43 दिवस आणि 2019 मध्ये 46 दिवस चालली. कोरोना साथीमुळे 2020-21 मध्ये यात्रा स्थगित करण्यात आली होती. 2024 मध्ये 52 दिवसांच्या अमरनाथ यात्रेत 5.1 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेत बाबा बर्फानीचे दर्शन घेतले. 2023 मध्ये 4.5 लाख यात्रेकरूंनी सहभाग घेतला. 2012 मध्ये विक्रमी 6.35 भाविकांनी दर्शन घेतले. 2022 मध्ये कोविडमुळे हा आकडा कमी झाला होता. तरीही 3 लाख यात्रेकरू दर्शनासाठी पोहोचले होते.