उत्तर प्रदेशात ‘इंडिया’चे जागावाटप निश्चित
अखिलेश यादव यांची माहिती : राज्यातील 11 जागा काँग्रेसला देण्याची तयारी
वृत्तसंस्था/ लखनौ
‘इंडिया’ आघाडीमधील संघर्षादरम्यान उत्तर प्रदेशातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील जागांसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये बोलणी पूर्ण झाली आहेत. येथे काँग्रेस 11 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे. ही आघाडीतील सौहार्दपूर्ण सुरूवात असल्याचे सांगत ‘इंडिया’ चमत्कार घडवेल, असा दावा त्यांनी केला आहे. तथापि, काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर काँग्रेससोबत जागावाटपाची घोषणा केली आहे. काँग्रेससोबतची आमची मैत्री दृढ झाली असून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली बोलणी अंतिम झाल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये सपाने काँग्रेसला 11 जागा देण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी रायबरेली आणि अमेठी या दोन जागा विचारात घेतल्या जात आहेत. याशिवाय आणखी कोणत्या नऊ जागा दिल्या आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. वृत्तानुसार, काँग्रेस पश्चिम उत्तर प्रदेशातील चार जागांवर निवडणूक लढवू शकते. यापैकी एक जागा अमरोहा ही असून तेथे कुंवर दानिश अली खासदार आहेत. गेल्या महिन्यात डिसेंबरमध्येच त्यांची बसपातून हकालपट्टी करण्यात आली होती. पश्चिम उत्तर प्रदेश व्यतिरिक्त पूर्वांचल आणि बुंदेलखंडमध्येही काँग्रेसला जागा दिल्या जाऊ शकतात. या महिन्याच्या अखेरीस जागांबाबत निर्णय घेणार असल्याचे सपा अध्यक्षांनी आधीच सांगितले होते. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसला रायबरेलीची एकच जागा मिळाली होती. अमेठीतही राहुल गांधींचा पराभव झाला होता