कोकण रेल्वेकडून सिंधुदुर्गची उपेक्षा !
मूलभूत रेल्वे सुविधांपासून सिंधुदुर्ग वंचित ; प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांचे आरोप
न्हावेली /वार्ताहर
कोकण रेल्वेच्या माध्यमातून होणाऱ्या विकासाचा सर्वाधिक फायदा गोवा ,कर्नाटक आणि केरळ या राज्यांनी उचलला आहे.मात्र , महाराष्ट्रातील लोकप्रतिनीधींच्या उदासीनतेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा आजही मूलभूत रेल्वे सुविधांपासून वंचित राहिला आहे.कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागात येणाऱ्या सिंधुदुर्गाला सुविधांच्या बाबतीत मागास ठेवल्याचा गंभीर आरोप कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी केला आहे.गोवा आणि कर्नाटक राज्यांना आधुनिक डेमू आणि मेमू गाड्यांचे जाळे मिळाले आहे.दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्यांची हक्काची आणि कमी तिकीट दराची पॅसेंजर सेवा देखील हिरावून घेण्यात आली आहे.जिल्ह्यातून धावणाऱ्या तब्बल तीस गाड्यांना महत्वाच्या स्थानकांवर थांबा नाही तरीही लोकप्रतिनीधी यावर आवाज उठवत नाही अशी खंत तळवडेकर यांनी व्यक्त केली. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे स्वप्न धूसर होणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे.हा प्रकल्प रखडल्यास त्याचे थेट परिणाम दोन प्रमुख घटकांवर होतील टर्मिनस झाल्यास दळणवळण वाढून रिक्षाचालक छोटे व्यवसायिक आणि हॉटेल उद्योगाला मोठा रोजगार मिळेल. मोपा विमानतळ आणि प्रास्तावित पंचतारांकित हॉटेल प्रकल्पांमुळे शिरोडा आरोंदा निवती येणाऱ्या पर्यटकांना सावंतवाडी ही मोठी सोय ठरेल.टर्मिनस नसल्यास हा आर्थिक फायदा हातचा जाईल.सध्या कोकणातून धावणाऱ्या बहुतांश गाड्या गोवा किंवा दक्षिण भारतासाठी आहेत.परिणामी कोकणच्या प्रवाशांना कोटा अपूरा पडतो. गणेशोत्सव होळी आणि उन्हाळी सुट्टीत चाकरमान्यांची मोठी ससेहोलपट होते.मुंबईकर चाकरमानी आणि स्थानिकांनी येऊन लढा देण्याचे आवाहन केले आहे.
सावंतवाडी टर्मिनस हा केवळ हा प्रकल्प नाही,तर ती कोकणच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे.केवळ स्थानिकांनीच नाही तर मुंबईतील चाकमान्यांनानीही संघटीत होऊन लोकप्रतीनीधींना या प्रश्नावर जाब विचारला पाहिजे.
---- सागर तळवडेकर,उपाध्यक्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटना