यंत्रणा दुरुपयोगाचे आरोप आधारहीन !
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या विविध वृत्तमाध्यमांना मुलाखती देण्याचा धडाका लावला आहे. एका प्रसिद्ध वृत्तसमूहाने नुकत्याच घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी केंद्र सरकारवरील आरोपांना चोख प्रत्युत्तर देतानाच, विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे...
‘विरोधकांकडून नेहमीच प्रवर्तन निदेशालय (ईडी) आणि इतर सरकारी अन्वेषण यंत्रणांचा दुरुपयोग होत असल्याचे आरोप होतात. तथापि, असा कोणताही दुरुपयोग होत नाही, हे स्पष्ट आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये 7 हजारांहून अधिक धाडी घातल्या. 1,800 हून अधिक प्रकरणे न्यायालयात सादर केली. 5 हजार इतर प्रकरणेही हाताळली जात आहे. त्यांच्यापैकी केवळ 3 टक्के प्रकरणे राजकीय नेत्यांविरोधात आहेत. मग ईडीचा दुरुपयोग केला जातो, असे कसे म्हणता येईल,’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे.
रेवड्यांची आश्वासने घातक
रेवडी आश्वासनांवरही त्यांनी कठोर टीका केली. विरोधी पक्ष निराशेच्या सागरात बुडत आहे. त्यामुळे आश्वासनांच्या खैरात करुन तो कसेबसे हातपाय मारण्याच्या प्रयत्नांमध्ये आहे. तथापि, या देशातील लोक स्वाभिमानी आहेत. आपली उपजिवीका कष्ट करुन करण्याला ते प्राधान्य देतात. मी स्वत: लोकांना काही वर्षांपूर्वी गॅसचे अनुदान स्वत:हून सोडा असे आवाहन केले होते. त्यावेळी कोट्यावधी लोकांनी ही सबसिडी सोडली होती कोरोना काळात माझ्या आवाहनाला प्रतिसाद देताना संसदसदस्यांनी आपले वेतनही सोडले होते. यावरुन हे दिसून येते की या देशातील लोकांना विनामूल्य काही नको आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मध्यपूर्वेशी जवळीकीचे संबंध
अलिकडच्या काळात आखादी देशांशी आपले संबंध सुधारले आहेत. असे पूर्वी का घडले नाही, या प्रश्नावर त्यांनी सरकारचे धोरण स्पष्ट केले. मी 13 वेळा आखाती देशांचे दौरे केले. तेथील भारतीय नागरीकांशी संवाद साधला. भारताचे महत्व त्या देशांच्या प्रशासनांना पटवून दिले. पूर्वीची सरकारे आखाती देशांकडून केवळ तेल आयात करणे आणि आपल्या कामगार शक्तीची तेथे स्वस्तात निर्यात करणे एवढीच कामे करीत होती. देशाचे सामर्थ्य त्यांनी कधी भक्कमपणे मांडले नाही. आता हे काम होत आहे. इतकेच नव्हे, तर आखाती देशांमध्ये मंदिरेही निर्माण केली जात आहेत. सरकारच्या धोरणामुळे स्थितीत परिवर्तन झाले आहे.
मध्यमवर्गियांसाठीच्या आरोग्य सुविधा
माझ्या सरकारने मध्यमवर्गियांसाठी आरोग्य सुविधा देण्याचा शक्य तितका प्रयत्न केला आहे. या सेवांमध्ये नेहमीच सुधारणा करण्याचे आमचे धोरण आहे. तथापि, कितीही चांगल्या सुविधा दिल्या जात असल्या, तरी मी स्वत: स्वत:च्या कार्यासंबंधी नेहमीच असंतुष्ट असतो. त्यामुळे अधिकाधिक सुधारणा करण्याचा माझा प्रयत्न असतो. केवळ मध्यमर्गियांनाच नव्हे, तर गरिबांमधील गरिबांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळाव्यात म्हणून आम्ही आयुषमान भारत ही योजना आणली आहे, असे त्यांनी आरोग्य विषयक प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट प्रतिपादन केले.
भारताच्या विकासाचा प्रचार
आपल्या तिसऱ्या कालखंडात भारताचा विकास अधिक वेगाने होईल, असे आपण आतापासूनच का म्हणता आहात ? या प्रश्नावर त्यांनी या विधानाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. या व्यक्तीला देश आणि जग यांच्यासंबंधी काय माहीत आहे, असा प्रश्न माझ्यासंबंधी 2013 मध्ये विचारला जात होता. तरी लोकांनी मला 2014 मध्ये संधी दिली. 2019 पर्यंत मी विश्वासार्ह व्यक्ती आहे, अशी शाश्वती लोकांना वाटू लागली. एवढी पायाभरणी झाल्यानंतर आता देश आर्थिक विकासाच्या दिशेने मोठी भरारी घेण्यासाठी सक्षम झाला आहे. त्यामुळे मी तिसऱ्या कालखंडात केवळ विकासाचीच भाषा करीत आहे, अशी मांडणी त्यांनी केली.
लोकांचा प्रतिसाद अद्भूत
आपण देशभर प्रचारसभा घेत आहात. लोकांचा प्रतिसाद पाहून काय वाटते, या प्रश्नावर त्यांनी लोकांचा प्रतिसाद अद्भूत असल्याची भावना प्रकट केली. ही लोकसभा निवडणूक जणू एकांगी पद्धतीने चालली आहे, असे वाटते. आम्हाला लोकांचे अभूतपूर्व समर्थन मिळत आहे. आमची कामगिरी मागच्या सरकारांच्या तुलनेत पुष्कळच चांगली आहे, याची मतदाराला जाणीव आहे. त्यामुळे मतदार आमच्याकडे अधिकाधिक आकर्षित होत आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.