मार्कंडेय नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
शहर पाणीपुरवठा महामंडळाचे आवाहन
बेळगाव : संततधार पावसामुळे राकसकोप जलाशय तुडुंब भरण्याच्या मार्गावर असल्याने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जलाशयाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून त्याद्वारे दोन इंच पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मार्कंडेय नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन शहर पाणीपुरवठा महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्ह्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्याचबरोबर राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने यंदा जून महिन्यातच राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. राकसकोप जलाशयाची एकूण उंची 2475 फूट इतकी आहे. खबरदारी म्हणून जलाशयाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. गुरुवारी पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे.
असून हे पाणी मार्कंडेय नदीला जाऊन मिळते. पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन शहर पाणीपुरवठा महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. दरवर्षी नदीच्या पुराच्या पाण्याखाली शेती जात असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. आठ दिवसांपूर्वी मार्कंडेय नदीला पूर आल्याने शेती पाण्याखाली गेली होती. त्यानंतर पावसाचा जोर ओसरल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र आता राकसकोप जलाशयातून विसर्ग सुरू झाल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
शहराला अद्यापही आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा
राकसकोप जलाशयात पाणीसाठा वाढला असला तरीदेखील शहराला मात्र अद्यापही आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे एलअॅण्डटीच्या या गलथान कारभाराबद्दल शहरवासियांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एलअॅण्डटीकडून शहर व उपनगरात अद्यापही जलवाहिनी घालण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे त्याचा फटका बेळगावकरांना बसत आहे.