अजित डोवाल रशियाचा दौरा करणार
युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी भारताचा पुढाकार
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
साऱ्या जगासाठी समस्या बनलेले युक्रेन-रशिया युद्ध थांबविण्यासाठी भारताने आता मोठ्या प्रमाणात पुढाकार घेण्यास प्रारंभ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलैमध्ये रशिया दौरा आणि ऑगस्टमध्ये युक्रेन दौरा केला होता. आता भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही रशियाचा दौरा करणार आहेत.
10 आणि 11 सप्टेंबरला डोवाल रशियामध्ये असतील. ते मॉस्को येथे विविध उच्चपदस्थ रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. युक्रेन-रशिया युद्ध कोणत्या मार्गांनी लवकरात लवकर थांबविता येईल, या मुद्द्यावर ही चर्चा होणार आहे. 27 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा झाली होती. युद्ध थांबविण्याची आपली इच्छा आहे, असे पुतीन यांनी स्पष्ट केले होते. तसेच भारत आणि चीन यांनी युद्ध थांबविण्यासाठी मध्यस्थी केली तर आपल्याला ती स्वीकार्य असेल, असेही त्यांनी सूचित केले होते. तेव्हापासून भारताकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
शांतता हाच मार्ग
कोणत्याही समस्या युद्धाच्या मार्गाने सुटत नाहीत. त्यासाठी शांततापूर्ण वाटाघाटी हाच मार्ग आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या रशिया आणि युक्रेन दौऱ्यांमध्ये स्पष्ट केले होते. भारत हा रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांचा मित्र असल्याने तो शांततेसंबंधी मध्यस्थी करण्यास सक्षम आहे, अशी अनेक युरोपियन देशांचीही धारणा आहे. या धारणेला अनुसरुन भारताची कृती होत आहे.
भारताची अमेरिकेशीही चर्चा
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी युक्रेन युद्धाच्या संदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्याशीही काही दिवसांपूर्वी दूरध्वनीवरुन चर्चा केली होती. हे युद्ध थांबणे हे जगासाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. या युद्धामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या जागतिक पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्या आहेत. याचा फटका अनेक युरोपियन देशांना बसला आहे. भारतालाही याचा त्रास होत आहे. त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर थांबावे अशी अपेक्षा विश्व समुदाय करीत आहे.
प्रारंभीचे प्रयत्न असफल
युक्रेन-रशिया युद्धाला प्रारंभ झाल्यानंतर काही आठवड्यांच्या नंतर युक्रेन आणि रशियाचे मध्यस्थ नेते युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, त्यांना संघर्ष थांबविण्यात यश येऊ शकले नाही. हीच स्थिती आजवर आहे. शांततेची चर्चा होत असली तरी, वस्तुस्थिती आहे तशीच आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत असून स्थावर मालमत्तेची तसेच जीविताची हानी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
इटलीने केली भारताची भलावण
युव्रेन युद्ध थांबविण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. चीनही याकामी साहाय्यभूत ठरु शकतो, असे प्रतिपादन इटलीच्या नेत्या जॉर्जिया मेलोनी यांनी केले आहे. मेलोनी यांनी नुकतीच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानंतर त्यांनी भारताच्या मध्यस्थीसंबंधी आशावाद व्यक्त केला. या युद्धात युक्रेनला साहाय्य करणे हे इटलीचे धोरण आहे. त्या धोरणात कोणतेही परिवर्तन केले जाणार नाही. मात्र, हे युद्ध थांबणे आवश्यक आहे. त्यासाठी भारत आणि चीनसारखे देश प्रयत्न करणार असतील, तर त्यांचे स्वागत आहे. हे दोन देश याकामी निर्णायक भूमिकाही घेऊ शकतात. आमचा त्यांना पाठिंबा आहे, असे मेलोनी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.