...दुष्काळात तेरावा महिना
शहापूर शिवारात उच्च विद्युत दाबामुळे कृषीपंप जळून खाक झाल्याने नुकसान
बेळगाव : अचानक उच्चविद्युत दाबाने वीजपुरवठा झाल्याने शहापूर शिवारातील कृषीपंप मीटरला आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. शेतकरी परिसरातच काम करत होते.अचानक मोठा आवाज झाल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता मीटरसाठी लावण्यात आलेली केबल जळून मीटरचे नुकसान झाल्याचे दिसून आले.शहरात अनेक ठिकाणी कमी व उच्च दाबाने वीजपुरवठा केला जात आहे. कमी दाबाने वीजपुरवठा केल्यास केवळ सिंगल फेजवरील उपकरणे चालत आहेत.तर काही ठिकाणी उच्च दाबाने वीजपुरवठा झाल्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे योग्य प्रमाणातील दाबानेच वीजपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे.रविवारी शहापूर शिवारातील सर्व्हे क्र. 26 मध्ये अचानक उच्च दाबाने वीजपुरवठा करण्यात आला. विजेचा दाब इतका जोरात होता, की स्फोट होऊन मीटर जळाले.आवाजाने हादरलेल्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता मीटरमधून आगीची ज्वाला बाहेर पडत असल्याचे दिसून आले. यामध्ये वायरिंग तसेच मीटरचे नुकसान झाले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याला हेस्कॉमने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.