खरीप हंगामासाठी कृषीकडून तयारी
बी-बियाणे, खते रयत संपर्क केंद्रात उपलब्ध : मागणीनुसार सवलतीच्या दरात बियाणे देणार
बेळगाव : खरीप हंगाम जवळ आल्याने कृषी खात्याने काटेकोर नियोजन करण्यावर भर दिला आहे. विशेषत: बी-बियाणे, कीटकनाशके आणि खतांचा योग्य पुरवठा करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. शिवाय शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खते कमी पडणार नाहीत, असा दावाही केला आहे. एकूणच कृषी खाते खरीप हंगामासाठी तयारी करत आहे. जिल्ह्यात गतवर्षी 7 लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्रात पेरणी आणि लागवड झाली होती. पावसाने साथ दिल्याने पेरणीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण झाले होते. त्याबरोबर यंदा वेळेत पेरणी पूर्ण व्हावी, यासाठी रयत संपर्क केंद्र, पीकेपीएस केंद्रांमध्ये बी-बियाणे उपलब्ध केली जात आहेत. हंगामाला प्रारंभ होताच शेतकऱ्यांना वेळेत बी-बियाणे वितरित केली जाणार आहेत, अशी माहितीही कृषीने दिली आहे.
बी बियाणे उपलब्ध करा
जिल्ह्यात 37 रयत संपर्क केंद्रे आणि हजारोंहून अधिक पीकेपीएस संघ आहेत. या सर्व केंद्रांमध्ये पुरेशी बी-बियाणे आणि खते उपलब्ध करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. त्यानुसार केंद्रांमध्ये बियाणे आणि खतांचा साठा केला जात आहे. हवामान खात्याने यंदा जूनच्या पहिल्या पंधरवड्यात मान्सूनला प्रारंभ होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये भात, सोयाबिन, भुईमूग, ज्वारी, मका, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी केली जाणार आहे. यासाठी संकरित बियाणांची गरज आहे. त्यानुसार कृषी खात्याकडून बियाणांचा साठा केला जात आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सवलतीच्या दरात त्यांना वितरण केले जाणार आहे.
कृषीची नजर
शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये किंवा अधिक दराने शेतकऱ्यांना बी-बियाणांची विक्री करू नये यासाठी कृषी खात्याचे पथक सज्ज राहणार आहे. शिवाय निकृष्ट दर्जाच्या बियाणांची विक्री झाल्यास कृषी खात्याकडे तक्रार करावी, असे आवाहनही केले आहे. हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी केंद्र आणि इतर बियाणांची विक्री करणाऱ्या दुकानांवर कृषी खात्याची करडी नजर राहणार आहे.