कृषी तलाव शेतकऱ्यांना लाभदायक
कृषीभाग्य योजनेंतर्गत अनुदान : उन्हाळ्यात सिंचनाद्वारे पिकांना पाणी, जिल्ह्यात एकूण 728 कृषी तलाव निर्माण करण्याचे उद्दिष्ट
बेळगाव : कृषी तलाव निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेती हिरवीगार होऊ लागली आहे. पावसाचे पाणी साठवून त्याचा गरजेनुसार पिकांना वापर करण्यासाठी या तलावांचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे कृषी तलाव शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू लागले आहेत. जिल्ह्यात एकूण 728 कृषी तलाव निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी 781 शेतकऱ्यांकडून अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 728 लाभार्थ्यांना कृषी तलावासाठी अनुदान उपलब्ध झाले आहे. साधारण 21×21×3 आकाराच्या तलावासाठी अंदाजे 1.13 लाख रुपये खर्च आहे. सामान्य शेतकऱ्यांसाठी 80 टक्के म्हणजेच 90 हजार 912 रुपये तर अनुसूचित जाती/जमातीतील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के म्हणजेच 1 लाख 2 हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यामुळे शेततळे निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांचाही प्रतिसाद मिळू लागला आहे.
तलावाभोवती कुंपणासाठी अनुदान
मानव आणि इतर प्राण्यांना तलावाचा धोका निर्माण होऊ नये यासाठी तलावासभोवती तारेचे कुंपण घालणे अनिर्वाय आहे. या कुंपणासाठीही अनुदान दिले जाते. सामान्य शेतकऱ्यांसाठी 40 टक्के (7600 ते 14,800 रुपये) तर अनुसूचित जाती/जमातीतील शेतकऱ्यांसाठी 50 टक्के (9500 ते 18,500 रुपये) अनुदान उपलब्ध होत आहे. तर सामान्य वर्गातील शेतकऱ्यांसाठी डिझेल पंप आणि प्लास्टिक ताडपत्रीसाठी 80 टक्के तर अनुसूचित जाती/जमातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के साहाय्यधन दिले जात आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात कृषी तलावांची संख्या वाढू लागली आहे. ठिबक सिंचनद्वारे उन्हाळ्यात पिकांना पाणी दिले जात आहे. अशावेळी कृषी तलाव उपयुक्त ठरू लागले आहेत. पावसाचे पाणी या तलावांमध्ये साचून ठेवले जात आहे आणि उन्हाळ्यात या तलावातील पाण्याचा वापर ठिबक सिंचनाद्वारे पिकांना केला जात आहे. त्यामुळे साहजिकच शेततलावांची मागणी वाढू लागली आहे.
अनुदानासाठी शेतकऱ्यांची मागणी
कृषीभाग्य योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तलाव निर्मितीसाठी अनुदान उपलब्ध होत आहे. कृषी तलावामध्ये साचलेल्या पाण्याचा वापर 4 ते 5 एकर क्षेत्रातील पिकांना केला जातो. त्यामुळे कृषी तलावाच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांची मागणी वाढू लागली आहे.
- शिवनगौडा पाटील (सहसंचालक कृषी खाते)