अवकाळीच्या माऱ्यात भातपीक जमीनदोस्त
तळकोकणातील शेतकऱ्याला सरकारच्या आधाराची गरज
ओटवणे । प्रतिनिधी
यावर्षी परतीचा पाऊस लांबल्यामुळे भात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेली भात शेतीही जमिनदोस्त झाली. तसेच भात शेतीतून पावसाच्यापाण्याचे लोट गेल्यामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कापणी केलेले भात पाण्याखालीच राहिल्यामुळे तसेच पावसाच्या सातत्यामुळे शेतीतील उभ्या भात पिकालाही कोंब फुटले आहेत.शेतकऱ्यांच्या भातशेतीत पावसाचे पाणी शिरल्यामुळे शेतीचे नुकसान झाले. कापणीच्या प्रतीक्षेत असलेल्या भातशेतीत पाणी साचून राहिल्यामुळे जमीनदोस्त झालेले भातपीक शेतीतच कुजले आहे. उभ्या भात पिकालाही कोंब आल्याने भात पीक घेणारा शेतकरी उध्वस्त झाला आहे. यावर्षी परतीचा पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट ठाकले आहे. सातत्यपूर्ण पावसामुळे ओल्या दुष्काळाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे विमा कंपनीसह महसूल व कृषी खात्याने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून योग्य भरपाई बाबत कार्यवाही करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून होत आहे.यावर्षी मे महिन्यातच अवकाळीच्या स्वरूपात सुरू झालेला मान्सून आतापर्यंत गेले सहा महिने पडत आहे. पावसाचा हंगाम वाढल्याने शेतकऱ्यांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. हा परतीचा पाऊस पाऊण महिना रखडल्यामुळे ऑक्टोंबरच्या अखेर कलिंगड लागवड करणारे शेतकरी यावर्षी अडचणीत आले आहेत.
भात नुकसान भरपाईचे
निकष बदलण्याची गरज
शासनाचे व पिक विमा उतरवणाऱ्या कंपन्यांचे निकष हे पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर बनवले गेल्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. भौगोलिक दृष्ट्या व हवामानाच्या दृष्टीने कोकण ,पश्चिम महाराष्ट्र व विदर्भामध्ये मोठी तफावत आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा एकच निकष लावल्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना ही पिक विमा नुकसान भरपाई मिळणे कठीण बनले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळण्याबाबत पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर व निलेश राणे यांनी याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकदाच शिंदे व अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे लक्ष वेधून कोकणातील न्याय मिळवून द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.