आंदोलनांकडे आंदोलकांची पाठ
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. परंतु यावर्षी आंदोलकांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारकडून आंदोलनांसाठी मंडप देण्यात आले असले तरी आंदोलकांनी पाठ फिरविल्याने यावर्षी रिकामे मंडप पाहावे लागत आहेत. नागरिकांच्या समस्यांची दखल घेण्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने आंदोलनाची धार कमी होत आहे का? असा सवाल उपस्थित केला. बेळगावमध्ये उत्तर कर्नाटकसह राज्यभरातील विविध संघटना, समाज आपल्या मागण्यांसाठी मोठी आंदोलने करतात. यावर्षी हलगा व कोंडुसकोप अशा दोन ठिकाणी आंदोलकांसाठी तंबू देण्यात आले आहेत.
आंदोलकांवर आले निर्बंध
यापूर्वी आंदोलन करताना केवळ संघटनेची माहिती पोलिसांकडे द्यावी लागत होती. आता मात्र परवानगी काढताना आंदोलन किती वेळ होणार? आंदोलकांची संख्या किती असणार? याची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. याबरोबरच आंदोलनाच्या ठिकाणी संपूर्ण तपासणी करूनच आत सोडले जात असल्याने या प्रक्रियेला वैतागून अनेक आंदोलक आंदोलनापासून दूर जात आहेत.
किती वर्षे आंदोलन करणार?
पहिल्या अधिवेशनापासून आजतागायत अनेक संघटना, समाज आपल्या मागण्यांसाठी आंदोलने करीत असतात. शेतकरी, कामगार, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या यांचे दरवर्षी आंदोलन होत असते. अनेक सरकारे आली आणि गेली तरी मागण्या मात्र मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे अजून किती दिवस आंदोलने करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.