बेकिनकेरेत कचरा उचल न केल्यास आंदोलन
गटारी तुंबल्याने दुर्गंधी : आरोग्य धोक्यात, ग्रा. पं. चे दुर्लक्ष
बेळगाव : बेकिनकेरे येथील गटारी स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी गटारींची स्वच्छता झाली आहे. मात्र, कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. परिणामी डास आणि माशांची पैदास वाढली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तातडीने गटारीतील काढलेला कचरा उचल करावा अन्यथा आंदोलन छेडू असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. गावातील गटारींची स्वच्छता करण्यात आली आहे. मात्र कोवाड रोड, नागनाथ गल्ली आणि इतर ठिकाणी स्वच्छता केलेला कचरा गटारी शेजारीच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तो कचरा पुन्हा गटारीत पडू लागला आहे. तर काही ठिकाणी माती, कचरा आणि सांडपाण्याने गटारी तुंबून गेल्या आहेत. त्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. विशेषत: नागनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी गटारी तुंबून राहिल्या आहेत. त्यामुळे भक्तांना नाक मुठीत धरूनच मंदिराकडे जावे लागत आहे. गटारीतून दुर्गंधी येत असल्याने गल्लीत बसणे देखील कठीण होऊ लागले आहे. लहान बालकांना खेळणे देखील अडचणीचे ठरू लागले आहे.
तक्रारीकडे ग्रा. पं. चा कानाडोळा
याबाबत ग्रा. पं. कडे सातत्याने तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र ग्रा. पं. ने याकडे कानाडोळा केला आहे. वास्तविक गटारींची बांधणी व्यवस्थित नसल्याने सांडपाणी साचून राहू लागले आहे. गटारीत कचरा, माती, गवत आणि प्लास्टिक साचून राहात असल्याने गटारींची दुर्दशा झाली आहे. दरम्यान काढलेल्या कचऱ्याची उचल झाली नसल्याने समस्येत भर पडू लागली आहे. ग्रा. पं. ने तातडीने कचऱ्याची उचल करावी, अशी मागणीही ग्रामस्थांतून जोर धरून आहे.
कचरा उचल नसल्याने गटारी पुन्हा भरल्या
गावातील काही गटारींची स्वच्छता झाली आहे. मात्र गटारीतील काढलेला कचरा गटारी शेजारीच ठेवण्यात आला आहे. कचऱ्याची उचल होत नसल्याने गटारी पुन्हा भरल्या आहेत. ग्रा. पं. कडे तक्रार केली तरी ग्रा. पं. पीडीओ आणि सदस्य याकडे दुर्लक्ष करतात. वाढत्या कचरा आणि दुर्गंधीमुळे जगणे असह्या होऊ लागले आहे.
धाकलू चिक्के, ग्रामस्थ.