आईपाठोपाठ ४५ वर्षीय मुलाचाही अंत; निपाणी परिसरातील 'त्या' दुर्दैवी घटनेने प्रत्येकाचे डोळे पाणावले!
आईच्या निधनाचा धक्का; मुलाचाही हृदयविकाराने मृत्यू
निपाणी: सुट्टीच्या निमित्ताने विरंगुळाम्हणून लेकीच्या गावाकडे गेलेल्या मातेचा मृत्यू झाला. आईचा मृत्यू झाला आहे ही बातमी मुलग्याला कळवण्यात आली. मुलगा तातडीने गावाकडे येण्यासाठी निघाला. या दुःखातच ददयविकाराचा तीव्र झटका आल्याने मुलाचाही मृत्यू झाला. आई पाठोपाठ मुलाच्याही झालेल्या मृत्यूमुळे नियतीने डाव साधला अशाच काहीशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आऊबाई अर्जुन सुतार (वय ८०) असे आईचे तर विजय अर्जुन सुतार (वय ४५) असे मुलाचे नाव आहे.
मुळगाव करंबळी (ता. गडहिंग्लज) तर सध्या रा. मुंबई येथील आऊबाई सुतार या यमगर्णी येथील मुलगी लिलाबाई सुतार यांच्याकडे राहायला आल्या होत्या. अगदी आनंदाने आपल्या लेकीकडे राहत असतानाच बुधवार २७ रोजी सायंकाळी निधन झाले. आईचे निधन झाले आहे आणि तू यमगर्णी येथे निघून ये असा निरोप मुलगा विजय यांना दिला. मुंबईहून मला पोहोचण्यासाठी वेळ लागेल पण तरीही मी येणारच असा निरोप दिला आणि मुंबईहून विजय निघाले. येत असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचवेळी त्यांचा देखील मृत्यू झाला.
आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुलगा येणार आहे. यामुळे पै-पाहुणे वाट पाहत असतानाच विजयच्या मृत्यूची माहिती पोहोचली. आईचा मृत्यू झाला अजून अंत्यसंस्कार देखील केले नाही तोपर्यंतच मुलाचा मृत्यू झाला. नियतीनेच हा डाव साधला असे म्हणत अनेकांनी दुःख व्यक्त केले. प्रत्येकाचे हृदय पिळवटून टाकणारी या घटनेने यमगर्णीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.