ठाकरेंपाठोपाठ पवारांनीही केले पत्ते खुले!
ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे सुतोवाच करताच पवारांच्याही थोरल्या पातीने धाकल्या पातीची युती होऊ शकते असे संकेत देत आपले पत्ते खुले केले. जेव्हा जेव्हा पवार आणि उद्योगपती अदानी यांची भेट होते तेव्हा राष्ट्रवादीचा काही ना काही महत्त्वाचा निर्णय होतो! अलीकडेच सावित्रीबाई फुले विद्यापीठात ते एकत्र आले आणि पवारांची मुलाखत प्रसिद्ध झाली. हा योगायोग नक्कीच नाही. अजितदादा किंवा सुप्रिया सुळे शरद पवारांच्या पक्षाचा निर्णय घेऊ शकत नाहीत. पण, त्यांनी धूर्तपणे हे नाव पुढे केले आहे. ‘सीर सलामत तो पगडी पचास’ हे पवारांचे धोरण कधीच लपून राहिलेले नाही. राष्ट्रवादीचे एकत्रीकरण झाले तर फटका एकनाथ शिंदे यांना बसू शकतो तसा भाजपातील निर्णय प्रक्रियेपासून दूर नेत्यांनाही. पवारांच्या या भूमिकेवर विश्वास ठेवून अजितदादांचा प्रस्ताव येतो का हे पाहणेही महत्त्वाचे...
राजकारणातील काही निर्णय हे प्रतिस्पर्धी किंवा मित्र पक्षांच्या धोरणाकडे लक्ष देऊन केले जातात हे महाराष्ट्राला काही नवीन नाही. मुंबई महापालिकेच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधूंनी एकत्र येण्याबाबत सुतोवाच केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया जशी भाजप आणि शिंदे तसेच काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादीत काय उमटते हेही पाहणे महत्त्वाचे होते. अपेक्षेप्रमाणे पवारांनीच आपले पत्ते खोलले. पण सवयीप्रमाणे संभ्रमही कायम ठेवला. यापूर्वी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती मोडताच राष्ट्रवादीनेही स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली. नंतरच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपची युती होऊन सत्ता येऊ नये म्हणून भाजपने न मागताही पवारांनी सत्तेला पाठिंबा दिला होता. त्यानंतरचा सगळा इतिहास लोकांच्या समोर आहेच. पण या पूर्वपिठिकेनुसार सध्याचेही राजकारण चालू आहे का? हे नजीकच्या काळात स्पष्ट होईलच.
यात आता अजितदादांची भूमिका पवारांशी मिळतेजुळते घेण्याची राहिली तरी इतर घटकांचा त्यांच्यावर दबाव येतो का हे पाहणे महत्त्वाचे. हे राजकारण 2014 आणि 2019 च्या राष्ट्रवादीतील राजकारणाच्या ठरलेल्या संहितेप्रमाणेच पुढे चालू आहे का की नवी काही खेळी आहे तेही समजून येईल. देशात इंडिया आघाडी पुन्हा उभी करण्यात पवारांचा मोठा वाटा होता. राज्याच्या महाविकास आघाडीचे ते प्रमुख आधारस्तंभ होते. मात्र या दोन्ही ठिकाणी काय घडले ते लोकांच्या समोर आहे. त्यानंतर बदललेल्या स्थितीत सुरू असलेल्या राजकारणाचा हा दुसरा भाग आहे.
ठाकरे बंधूंनी एकीची भाषा करून ती सुरू केली. त्यांचे आपसात किती जमणार, एकत्रीकरण होणार, मनोमिलन होणार, पडद्याआड अंडरस्टँडिंग होणार की चर्चा पूर्णत: फिस्कटणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण, त्यांनी आपल्या अनुयायी आणि मतदारांचा अंदाज घेताना एकमेकाची मतजमावणी आणि राजकारण अशी दुहेरी संधी साधली आहे. दोघांना खरोखर एकत्र यायचे आहे की आपण आपल्या मतदारांना सुखावण्यात मागे नव्हतो हे दाखवायचे आहे हे स्पष्ट झालेले नाही. पण, याकाळात पवारांच्या पक्षात असलेली चलबिचल लपून राहिलेली नाही. पवारांच्या सुरुवातीपासूनच्या राजकारणाकडे एक कटाक्ष टाकला तर सत्तेत राहून राजकारणाला त्यांचे अनुयायी साथ देतात. त्यामुळेच अजित पवार भाजप सोबत गेले तरी पवारांबरोबर राहिलेल्यांमध्येही पुन्हा भाजप सोबत जावे असे मत मांडणारा एक गट तयार झाला आहे.
याचा अर्थ पवारांच्या अनुयायांना पवारांच्या विचारांपेक्षा सत्ता महत्त्वाची आहे. कारण ती नसेल तर बरेच काही गमवावे लागू शकते. परिणामी पवार या वर्गाचे ऐकत आहेत असे फक्त दाखवत आहेत, की सुप्रिया सुळेंसह आपल्या अनुयायांची अडचण दूर करून देत आहेत हे नजिकच्या काळात लक्षात येईल. पवार यांनी भाजपच्या केंद्रातील सत्तेला पूर्वीही साथ दिली होती. तो प्रयोग वाजपेयी सत्तेच्या काळात झाला होता. आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या निर्मितीचे निमित्त करून कॅबिनेट दर्जाचे पद स्वीकारून त्यांनी भाजप आणि काँग्रेस दोन्हीकडे ताळमेळ साधला होता. तसे सुप्रिया सुळेंच्या बाबतीत प्रस्ताव दिले जाऊ शकतात अशी एक शक्यता आहे. पण, सुप्रिया सुळे यांना कॅबिनेट दर्जा दिला तर प्रफुल्ल पटेल यांना काय मिळणार? महाराष्ट्र मंत्रिमंडळात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहीत पवार यांच्यासह अनेकजण मंत्रिपदाचे हक्कदार आहेत.
दोन्ही राष्ट्रवादीचे मनोमिलन झाले तर कोणाचे मंत्रीपद काढले जाणार आणि कोणाला दिले जाणार? अजितदादांच्या सोबत बाहेर पडलेली मंडळी हा बदल सहन करणार का? हेही प्रश्न आहेतच. पवारांच्या वेळोवेळी भूमिका बदलण्याचे फटके वसंतदादा पाटील, समाजवादी पक्ष, जनता पार्टी, भाजप, शे का पक्षासह डावी आघाडी, जनता दल यांना बसले. तसेच राष्ट्रीय राजकारणात पी. ए. संगमा, तारीक अन्वर तर कधीकाळी सुरेश कलमाडी यांना देखील बसले आहेत. ही यादी अनुभवानुसार खूप मोठी होऊ शकते.
पण, आजच्या स्थितीत याचा फटका कोणाला बसू शकतो याचा विचार केला तर एकच नाव पुढे येते. ते म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील! एकतर पवारांनी स्वत: प्रयत्न करून जयंत पाटील यांच्यासाठी जागा निर्माण करावी लागेल किंवा मग या मनोमिलनाचे फटके सोसावे लागतील. अर्थात जयंतरावना बाजूला ठेवण्याच्या राजकारणाला अजित पवार साथ देतात की त्यांचीच साथ घेतात हा निर्णयही खूप महत्त्वाचा ठरू शकतो. पवार एक मुलाखत देऊन गप्प बसले असले तरी यामुळे सर्व पक्षांचे राजकारण ढवळले गेले आहे.
याचा परिणाम खोलवर होऊ शकतो. एकनाथ शिंदे यांनी आजपर्यंत आपली वज्रमूठ कायम ठेवली असली तरी यानंतर ती सैल करण्याचे राजकारण तापू शकते. सामंत, सरनाईक या नावांची चर्चा त्यासाठी आधीपासून सुरू आहेच. फडणवीस सोडून सत्तेत महत्त्व न उरलेले नेते चुळबूळ सुरू करू शकतील. त्यातून जिह्याजिल्ह्यात गोंधळ उडू शकतो. काँग्रेस आणि ठाकरे सेना मुंबईसह मराठवाडा, विदर्भ पट्ट्यात काही मंडळींना आपल्या तंबूत आणण्यासाठी झटू शकतात. काँग्रेसची जुनी घराणी नव्या संधी शोधू शकतात. राजकारण ढवळले गेले आहे आणि ते अधिक गढूळ आणि बेभरवशाचे भासू लागले आहे. ते निवळते की अजून गोंधळ वाढवते ते लवकरच लक्षात येईल.
शिवराज काटकर