भारताच्या कठोर भूमिकेनंतर जर्मनीचा सूर नरमला
वृत्तसंस्था /बर्लिन
भारतासोबत एका विश्वासाच्या वातावरणात काम करण्याची आणि संबंध वृद्धींगत करण्याची इच्छा असल्याचे जर्मनीकडून म्हटले गेले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक झाल्यावर जर्मनीने केलेल्या वक्तव्याप्रकरणी भारताने नाराजी व्यक्त केली होती. तसेच भारतीय विदेश मंत्रालयाकडून जर्मन मुत्सद्याला पाचारण करत निषेध नोंदविण्यात आला होता. यामुळे दोन्ही देशांदम्यान तणाव दिसून आला होता. हा तणाव कमी करण्यासाठी जर्मनीने डॅमेज कंट्रोल सुरू केला असून भारतासोबत चांगले संबंध राखण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जर्मनी आता केजरीवालांच्या अटकेसंबंधीच्या टिप्पणीवरून मागे हटत असल्याचे चित्र आहे. संबंधित टिप्पणीप्रकरणी भारताने जर्मनीच्या वरिष्ठ मुत्सद्याला पाचारण करण्यात आल्यावर जर्मनीचा सूर बदलला आहे. भारतीय राज्यघटना मूलभूत मानवी मूल्ये आणि स्वातंत्र्याची हमी देते. आम्ही आशियात एका महत्त्वपूर्ण भागीदाराच्या स्वरुपात भारतासोबत या लोकशाहीवादी मूल्यांची पाठराखण करतो असे जर्मन विदेश मंत्रालयाकडून म्हटले गेले. भारतातील घडामोडींविषयी जर्मनीच्या विदेश मंत्रालयात चर्चा झाली आहे. भारत आणि जर्मनीच्या दृढ संबंधांकरता आम्ही प्रयत्नशील आहोत असे जर्मनीच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने नमूद केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मागील आठवड्यात ईडीने अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. जर्मनीच्या विदेश मंत्रालयाने केजरीवालांच्या अटकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले हेते. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि मूलभूत लोकशाहीवादी तत्वांशी निगडित मापदंड या प्रकरणी लागू केले जातील अशी आम्ही अपेक्षा करतो. आरोपांना तोंड देणाऱ्या कुठल्याही व्यक्तीप्रमाणे केजरीवाल हे देखील निष्पक्ष सुनावणीस पात्र आहेत, अशी टिप्पणी जर्मनीकडून करण्यात आली होती.