‘आदित्य एल-1’ सूर्यासमीपच्या कक्षेत आणला जाणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सूर्याच्या अभ्यासासाठी भारताने प्रक्षेपित केलेला उपग्रह ‘आदित्य एल-1’ आता सूर्याच्या आणखी नजीक आणला जाणार आहे. आज शनिवारी इस्रोचे तंत्रज्ञ ही प्रक्रिया पूर्ण करण्याची शक्यता आहे. ही कक्षा एल-1 या सांकेतिक नावाने ओळखली जाते. ही सूर्याजवळची अंतिम कक्षा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
आदित्य एल-1 हा भारताचा उपग्रह एका प्रयोगशाळेचे काम करीत आहे. तो सूर्याच्या विविध स्थितींचे निरीक्षण करून त्यांची छायाचित्रे पाठवत आहे. सध्या तो सूर्याच्या अंतिम कक्षेच्या अलिकडच्या कक्षेत आहे. शनिवारी त्याला सूर्याच्या जवळच्या अंतिम कक्षेत आणले जाणार आहे. ही कक्षा ‘हॅलो ऑर्बिट’ या नावानेही ओळखली जाते. एल-1 या कक्षेत सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती या जवळपास समान असतात. या कक्षेच्या पलिकडे कोणतीही वस्तू गेल्यास ती सूर्याकडे खेचली जाते आणि ती सूर्याच्या प्रचंड उष्णतेत नष्ट होते. त्यामुळे ही सूर्यानजीकची अंतिम कक्षा मानण्यात येते.
इस्रोसमोरचे आव्हान
या अंतिम कक्षेपर्यंत उपग्रहाला नेणे हे फारसे अवघड काम नाही. तथापि एकदा ही कक्षा गाठल्यानंतर उपग्रह या कक्षेत स्थिर ठेवणे हे आव्हानात्मक काम आहे. यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. तथापि, इस्रोने हे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्जता केली असून त्यादृष्टीने शनिवार महत्त्वाचा ठरणार आहे. अशा प्रकारचा इस्रोचा हा प्रथम प्रयत्न आहे, अशी माहिती देण्यात आली.
पाच कक्षांचा विचार
सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाची शक्ती आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची शक्ती यांचा जवळपास समतोल साधणाऱ्या पाच कक्षा आहेत. त्यापैकी एल-1 ही कक्षा सूर्याच्या सर्वात नजीक आहे. इस्रोला आपल्या प्रयत्नांमध्ये यश मिळते की नाही, हे शनिवारी समजणार आहे. ‘आदित्य एल-1’ हे भारताचे प्रथम सूर्यअभियान आहे.