Kolhapur News : कोल्हापुरातील पदपथावरील अतिक्रमणांवर होणार कारवाई
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम सुरू
कोल्हापूर : मुंबई उच्चन्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिकेकडून पदपथवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेकडून सोमवार ८ रोजीपासून धडक मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये प्रमुख रस्त्यांलगतच्या विक्रेत्यांवर कारवाई करत साहित्य जप्त केले जाणार आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवरील पदपाथवर बांधकाम साहित्य, मातीचे ढिगारे ठेवणे तसेच बस स्टैंड, धार्मिक स्थळे, शाळा, रुग्णालये, न्यायालये व सरकारी कार्यालये अशा अतिगर्दीच्या ठिकाणी चहा, नाश्ता, फळभाजी किंवा कोणताही किरकोळ व्यवसाय करणे पूर्णपणे बंदीचे आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सर्व फेरीवाले, हातगाडी, फळ विक्रेते, चहानाश्ता हातगाडी चालक आणि इतर छोट्या विक्रेत्यांना फुटपाथवरील साहित्य तत्काळ हटविण्याचे निर्देश दिले आहेत. सोमवारपासून अशा प्रतिबंधित ठिकाणी व्यवसाय करताना कोणी आढळल्यास त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल तसेच त्यांचे साहित्य जप्त केले जाईल, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.