गौणखनिज तक्रारीबाबत आता 7 दिवसात होणार कारवाई
रत्नागिरी :
बढ्या मंडळींच्या उघड अथवा छुप्या आशीर्वादाने ठिकठिकाणी वाळू, खडी, माती, आदी गौणखनिजाचे उत्खनन सुरु असते. याविषयी जागरुक नागरिकांनी तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली तरी त्याची दाद घेतली जात नाही. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी कालमर्यादा निश्चित केली आहे. आता तक्रार दाखल झाल्यापासून 7 दिवसात प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करावी, असा शासन निर्णय जारी केला आहे.
राज्य सरकारच्या महसूल व वनविभागाने शुक्रवारी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला. सामान्य नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधींकडून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक या विषयाबाबत प्राप्त झालेली निवेदने लक्षात घेऊन 7 दिवसात पाहणी व चौकशी करावी. महसूल संहितेतील तरतुदीप्रमाणे दंडात्मक कार्यवाही करावी. तक्रारदाराला त्या बाबतची माहिती लेखी स्वरुपात कळवावी. लोकप्रतिनिधींच्या तक्रारअर्जावर केलेल्या कार्यवाहीबाबत तत्काळ स्थानिक लोकप्रतिनिधींना कळविण्यात यावे. शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही न झाल्यास सक्षम अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन कारवाई करण्यात येईल, असा इशारा या शासन निर्णयात देण्यात आला आहे.