बारा तासांत चारजणांचा अपघाती मृत्यू
बांबोळी, वास्को, धारबांदोडा, सुळकर्णेत अपघात : जनजागृती उपक्रमांचा उपयोग नसल्याचे स्प
पणजी : राज्यात वाहन अपघातांमधील मृत्यूंचे सत्र सुऊच असून अवघ्या 12 तासांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. वाहतूक पोलीस वाहनचालकांत जागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच वाहतूक सुरक्षा सप्ताहांचे आयोजन केले जात आहे मात्र प्रत्यक्षात त्याचा काहीच फायदा होत नसून अपघात होतच आहेत. एकूणच अपघात हा विषय चिंताजनक बनला आहे. रविवारी दुपारी धारबांदोडा येथील अपघातात गोकुळदास गावकर, त्यानंतर रात्री वास्कोत झालेल्या अपघातात समीर गोसावी आणि मध्यरात्री बाराच्या सुमारास बांबोळीत झालेल्या अपघातात श्रीपाद मोरजकर यांचा मृत्यू झाला आहे. केपे परिसरातील सुळकर्णे येथे झालेल्या अपघातात सदानंद बारकेलो गांवकर हा 37 वर्षीय युवक जागीच ठार झाला. बांबोळी येथे नियाझ रेस्टॉरंटजवळ झालेल्या स्वयं अपघातात श्रीपाद मोरजकर (54, पर्वरी) यांचा मृत्यू झाला आहे. ते दुचाकीवरून बांबोळीहून पर्वरीच्या दिशेने जात होते. नियाज रेस्टॉरंटजवळ पोहोचल्यावर त्यांचा दुचाकीवरील ताबा गेला अन् अपघात झाला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ गोमेकॉत भरती करण्यात आले. गोमेकॉत उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. ते वर्तमानपत्र विक्रीचा व्यवसाय करायचे. जुने गोवे पोलिसांनी उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृत देह कुटुंबियांच्या ताब्यात दिला.
वास्कोत व्यवसायिकाचा मृत्यू
वास्को शहरातील एफ. एल. गोम्स मार्गावरील झेड स्क्वेअर सिने टॉकीजसमोर रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या स्वयंअपघातात बेलाबाय वास्को येथील व्यवसायिक समीर महादेव गोसावी (54) यांचा मृत्यू झाला. समीर गोसावी हा आपल्या दुचाकीने एफ. एल. गोम्स मार्गावरून आपल्या घरी बेलाबायच्या दिशेने जात होता. अचानक ब्रेक लावल्याने त्याचे दुचाकीवरील नियंत्रण गेले. त्यामुळे ते दुचाकीवरून खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. जखमी अवस्थेत त्यांना चिखलीतील उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले. काल सोमवारी सायंकाळी बोगदा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई असा परिवार आहे. मयत समीर गेली बरीच वर्षे चिरकोन उडी बेलाबाय येथे तयार खाद्यपदार्थ विकण्याचा व्यवसाय करायचे. त्यामुळे वास्कोत लोकांमध्ये ते परिचित होते.
सुळकर्णे अपघात युवक ठार
केपे परिसरातील सुळकर्णे येथे झालेल्या अपघातात सदानंद बारकेलो गांवकर हा 37 वर्षीय युवक रविवारी मध्यरात्री जागीच ठार झाला. अवेडे-पारोडा येथे मयत काम करीत होता. कामावरुन सुटल्यानंतर दुचाकीवरुन घरी जात असताना कसणे सुळकर्णे येथे गावकर यांचा वाहनावरील ताबा गेला आणि वाहनाची धडक रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला बसली व त्यात गावकर जागीच ठार झाला, अशी केपे पोलिसांनी माहिती दिली. शवचिकित्सेनंतर मयताचा मृतदेह मयताच्या नातेवाईकांडे सोपविण्यात आला. या प्रकरणी उपनिरीक्षक आर. भोसले पुढील तपास करीत आहेत.