शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य करा
रयत संघ, हसिरु सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सरकारने दबावतंत्र थांबवण्याची मागणी
बेळगाव : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी दिल्ली येथे शेतकरी संघटनांकडून आंदोलन हाती घेण्यात आले आहे. सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आंदोलन हाती घेतल्यामुळे सरकारकडून आंदोलन बळाच्या जोरावर दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने हे धोरण थांबवून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशा मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघ व हसीरु सेना यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शेतकऱ्यांकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या मालाला हमीभाव देण्यात यावा. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याच्या दृष्टिने धोरण राबविण्यात यावे. डॉ. एम. एस. स्वामीनाथन् अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी दिल्ली येथे शेतकरी संघटनांकडून आंदोलन छेडण्यात आले आहे. मात्र हे आंदोलन सरकारकडून पोलिसांच्या बळावर दडपले जात आहे. शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणली जात आहे. सरकारने दबावतंत्र त्वरित थांबवावे. शेतकऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. अश्रुधारा नळकांड्या फेकून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा शेतकरी संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात आले. खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याची त्वरित भरपाई देण्यात यावी. शेतकऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन पोलीस बळावर न दडपता शेतकऱ्यांशी चर्चा करून समस्यांचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी पार्वतम्मा कळसण्णावर, कलगौडा पाटील, अण्णम्मा देसाई, अशोक होसपेटी, प्रकाश लोहार, वैजु लुम्याचे आदी शेतकरी उपस्थित होते.