बिडी-बेकवाड परिसरात आंब्याचे भरघोस उत्पादन
खरेदीसाठी व्यापाऱ्यांची धडपड : एपीएमसीकडून खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी
खानापूर : तालुक्यातील बेकवाड, बिडी भागात हापूससह इतर जातीच्या आंब्यांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. दरवर्षी या भागात मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन होते. येथील आंबा कोकणातील आंब्याच्या चवीला साध्यर्म असल्याने येथून आंब्याची खरेदी बाहेरील व्यापारी मोठ्या प्रमाणात करतात. यासाठी बिडी, बेकवाड भागात बाहेरील व्यापारी आंबा खरेदीसाठी महिनाभर वास्तव्य करून वजनावर आंबा खरेदी करतात. यावर्षीही आंब्याच्या खरेदीसाठी बाहेरील व्यापारी दाखल झाले असून बिडी, बेकवाड भागात जागोजागी आंबा खरेदीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
या भागात गेल्या काहीवर्षापासून आंब्याचे उत्पादन वाढले असून या भागात जवळपास वर्षाला एक ते दीड हजार टन आंब्याचे उत्पादन होते. पुणे, मद्रास, मुंबई, कोल्हापूर यासह इतर ठिकाणचे व्यापारी आंबा खरेदी करून विक्रीला नेत आहेत. घावूक खरेदीसाठी कच्चा आंबा प्रतवारीनुसार 30 ते 75 रुपये किलोप्रमाणे खरेदी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडून आंबा मिळविण्यासाठी व्यापाऱ्यांची चढाओढ सुरू आहे. या भागात जवळपास दहा ते पंधरा व्यापाऱ्यांनी काटा लावून खरेदी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
एपीएमसीकडून खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी
तालुक्यातील नंदगड येथे अस्तित्वात असलेल्या एपीएमसी सोसायटीकडून कोणत्याही शेती मालाची आणि फळांची खरेदी करण्यात येत नाही. इतर ठिकाणी एपीएमसीकडून शेती उत्पादनांची आणि फळांची खरेदी करण्याची सोय आहे. नंदगड येथे एपीएमसी सोसायटी मात्र नावापुरतीच आहे. या एपीएमसी सोसायटीमधून कोणत्याच शेती मालाची खरेदी करण्यात येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या दरावर अवलंबून रहावे लागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. यासाठी नंदगड येथील एपीएमसी सोसायटीकडून शेती मालाची आणि बागायतदाराकडून फळांची खरेदी करण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याबाबत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी लक्ष घालून नंदगड येथील एपीएमसी सोसायटीच्या माध्यमातून शेत मालाची खरेदी होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.