अबब...पंचवीस गुंठे जमिनीत 52 टन ऊस!
कुद्रेमनी ग्रामपंचायत अध्यक्ष संजय पाटील यांचा नवा उपक्रम : ऊस 17-18 फूट वाढला उंच
वार्ताहर /कुद्रेमनी
यंदा शेतातील पिकांसाठी पुरेसा पाऊस झाला नसल्याने म्हणावी तशी पिके आली नाहीत. ऊसपीक शेतकऱ्यांचा आर्थिक कणा समजला जातो. ऊस उत्पादनातही घट होवून नुकसान झाल्याची चर्चा आहे. मात्र कुद्रेमनी ग्रा. पं. अध्यक्ष संजय यल्लाप्पा पाटील यांनी पंचवीस गुंठे जमिनीत 52 टन ऊस पिकवून नवा उपक्रम बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात केला. सलग पंधरा वर्षे एकवेळ ग्रा. पं. सदस्य व दोन वेळा ग्रा. पं. अध्यक्ष म्हणून गावची जबाबदारी ते सांभाळत आहेत. गावातील विकास कामांची जबाबदारी पार पाडत फावल्या वेळेत त्यांनी आपल्या शेती कामांकडे सतर्कतेने लक्ष दिले आहे. आपल्या शेतात विक्रमी ऊस उत्पादन घेतल्याबाबत ते ‘तरूण भारत’शी बोलताना म्हणाले, कोणतेही काम काळजीपूर्वक व सतर्कतेने केल्यास ते चांगले होते. आपल्या शेतातील पंचवीस गुंठ्यात ऊस केला होता. प्रारंभी उसावर तांबेरा रोग पडून ऊस खराब झाला होता. सगळं वाया जाणार ही भीती मनात होती. पण निराश न होता उसाची काळजी घेतली. उसावर औषध फवारणी केली. शेणखत घातले, रासायनिक दाणेदार खत घालून वेळ मिळेल तेव्हा रात्री, दिवसा विहिरीचे पाणी सोडले. त्यानंतर शेतातील खराब झालेला ऊस सतरा ते अठरा फूट उंच वाढला.
शेती काळजीपूर्वक करण्याची गरज
ऊस दौलत व म्हाळुंगे साखर कारखान्यांना पाठविण्यात आला. उसाचे हे पिकलेले मोठे पीक पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी पाहून आश्चर्य व्यक्त केले. शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय करताना तो काळजीपूर्वक करावा, असे मत संजय पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.