आप सरकारचा 3जी घोटाळा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप, पराभवाच्या भितीने अनेकांचे मतदार संघ बदलले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभेतील अरविंद केजरीवाल यांच्या आपचे सरकार घोटाळे बहाद्दर आणि घपलेबाज व घुसखोरांना आश्रय देणारे असे 3 जी सरकार असल्याचा घणाघाती आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहा यांनी मुस्तफाबाद येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आपचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांची जागा पटपडगंजमधून बदलण्यात आली. याशिवाय इतर अनेक नेत्यांची तिकिटे रद्द करण्यात आली ती पराभवाच्या भीतीनेचे असेही शहा म्हणाले.
‘3जी‘चा अर्थ सांगताना शहा म्हणाले, पहिल्या ‘जी‘चा अर्थ घोटाळ्यांनी भरलेले सरकार, दुसऱ्या ‘जी‘चा अर्थ घुसखोरांना आश्रय देणारे सरकार आणि तिसऱ्या ‘जी‘चा अर्थ भ्रष्टाचार (घपले) करणारे सरकार असल्याचे ते म्हणाले. यमुना नदीच्या स्वच्छतेसंदर्भात बोलताना अमित शाह यांनी केजरीवालांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, केजरीवाल म्हणाले होते की, आपण यमुना नदी स्वच्छ करू, छठ पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल आणि मी यमुनेत डुबकी मारेन. पण आजपर्यंत ना छठपूजेच्या घाटांची सुधारणा झाली ना यमुनेचे पाणी स्वच्छ झाले.
तुम्हीच प्रदूषण पसरवून यमुनेचे पाणी विषारी केले -
हरियाणा सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळले, असे म्हणत ते (केजरीवाल) केवळ बहाणा करत आहेत. केजरीवालजी, हरियाणा सरकारने विष मिसळले नाही, तर तुम्हीच प्रदूषण पसरवून यमुनेचे पाणी विषारी केले आहे, असा आरोपही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी केला.