Cultural Kolhapur Panchganga Ghat: मातृप्रेमाचा आणि देशभक्तीचा साक्षीदार, कोल्हापुरातील आईसाहेबांचा घाट
....हाच घाट पुढे आईसाहेबांचा घाट म्हणून परिचित झाला
By : सौरभ मुजमदार
कोल्हापूर : पंचगंगेच्या या पवित्र काठावरच कोल्हापूरचा जाज्वल्य इतिहास दडलेला आहे. आजही येथील वाहत्या पाण्यामधून जणूकाही तो कोल्हापूरकरांना आर्त साद घालीत आहे. क्षणभर यावे या काठावर भटकावे त्यानंतरच येथील पाऊलखुणा आपल्याला स्पष्ट दिसू लागतील.
कितीही टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या तरी या पंचगंगेच्या पवित्र घाटाविना आपण कोल्हापूरकर सदैव अपूर्णच राहू. याच काठावरील शिवाजी पूलाकडील असणारा मातृप्रेम व देशभक्तीचे प्रतीक असणारा काहीसा अपरिचित सर्वात शेवटचा स्मशानभूमीकडील घाट म्हणजेच ‘आईसाहेबांचा घाट’ होय.
इतिहास अभ्यासक व कोल्हापूरच्या या इतिहासाच्या संशोधनासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे भारत महारुगडे यांनी या घाटाबाबत मौल्यवान माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) यांच्या पत्नी व बुवासाहेब महाराज यांच्या सावत्र मातोश्री उमाबाई राणीसाहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक तुलसी वृंदावन याच परिसरात होते.
1830 चा कालखंड कोल्हापुरात अजून ब्रिटिश सत्तेचा अंमल नव्हता. छत्रपती बुवासाहेब महाराज यांनी याच तुलसी वृंदावनाभोवती आपल्या मातृस्मृती प्रित्यर्थ देवालय बांधले. सोबतच स्मशानभूमीसाठी येणाऱ्या प्रजेच्या धार्मिक विधींसाठी वैशिष्ट्यापूर्ण असा दगडी घाट साकारला. हाच घाट पुढे आईसाहेबांचा घाट म्हणून परिचित झाला.
स्वत: छत्रपतींना या घाटाच्या उभारणीची पाहणी करत असताना उजव्या पायाच्या करंगळी जवळील बोटाला दुखापतदेखील झालेली होती असे समजते. घाटाच्या पहिल्या टप्प्यात दोन्ही बाजूला पंचगंगेच्या नदीमध्ये अर्धवट बुडालेले उंच दगडी बुरुज आहेत. शेजारील दगडात शिवलिंग कोरलेली दिसतात.
दुसऱ्या टप्प्यात पायऱ्या तर तिसऱ्या टप्प्यात दोन्ही बाजूला विशाल बुरुज व वैशिष्ट्यापूर्ण षटकोनी बांधकाम दिसून येते. ज्याच्यासमोरच आईसाहेबांचे भक्कम दगडी बांधकामात असणारे झाडीत लपलेले देवालय आहे. हा आईसाहेबांचा घाट बुवासाहेब महाराजांच्या मातृप्रेमाचे प्रतीक तर आहेच शिवाय कोल्हापूरकरांच्या धैर्याचा,शौर्याचा, पराक्रमाचा व देशभक्तीचा साक्षीदार देखील म्हणावा लागेल.
इ.स.1857 च्या उठावानंतर एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कोल्हापुरातील क्रांतिकारक संघटना म्हणजे शिवाजी क्लब होय.अठरा पगड जातीचे हजारो तरुण या शिवाजी क्लब अंतर्गत देशभक्तीसाठी कार्यरत होते. हे सर्व तरुण शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज व शक्तीचे प्रतीक श्री हनुमान देवता यांच्या प्रतिमा आईसाहेबांच्या याच घाटावर ठेवून त्यासमोर दांडपट्टा, विटा, फरीगदगा, पळणे, पोहणे यांचा सराव करीत असत.
कदाचित लोकवस्तीपासून दूर पंचगंगा नदीच्या कुशीत दडलेला हा वैशिष्ट्यापूर्ण आईसाहेबांचा घाट त्यावेळी त्यांना एक वेगळीच प्रेरणा देत असावा. या तरुणांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना बॉम्बस्फोटाने उडविण्यासाठी प्रायव्हेट हायस्कूलमधून रसायनेही त्यावेळी शिताफिने बाहेर काढलेली होती असे समजते.
बुधवार पेठेतून खाली आल्यावर स्मशानभूमीच्या अलीकडेच एक वाट पंचगंगा नदीकडे जाते. जी थेट याच आईसाहेबांच्या घाटावर नदीपात्रात येते. आपण आपल्या धावपळीच्या जीवनात एकदा तरी या घाटावर जाऊन येथील शिल्पबांधणीचा हा नमुना पाहिल्यास करवीरच्या छत्रपतींच्या मातृभक्तीच्या स्मृती आपणास पाहण्यास मिळतीलच शिवाय वाऱ्याची येणारी एखादी मंद झुळूक हजारो देशभक्त तरुणांच्या आठवणी नकळत जागी करून जाईल हे मात्र नक्की!