लांजात दुचाकी अपघातात रत्नागिरीतील तरुणाचा मृत्यू
लांजा :
शहरातील आयटीआयसमोर शनिवारी रात्री दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. या अपघातात रत्नागिरी येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून लांजा येथील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार 12 जुलै रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास शैलेश शिवराम जाधव (45, रा. तोणदे बौद्धवाडी व सध्या रा. परटवणे अशोकनगर ता. रत्नागिरी) हे त्यांच्या मालकीची पॅशन प्रो दुचाकी (क्र. एमएच 08 एटी 8671) घेऊन तोणदे ते लांजा असा प्रवास करत होते. दरम्यान, लांजा शहरातील आयटीआय येथून ते प्रवास करत असताना समोरून येणारा दुचाकीस्वार आशिष संदीप घडशी (22, रा. कुर्णे घडशीवाडी, ता. लांजा) याच्या अॅक्टिव्हा दुचाकीने (क्र. एमएच 08एडब्ल्यू 0091) जाधव यांच्या दुचाकीला धडक दिली. समोरासमोर धडक होताच शैलेश जाधव हे रस्त्यावर पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस तत्काळ त्या ठिकाणी दाखल झाले आणि जाधव यांना ऊग्णवाहिकेने लांजा ग्रामीण ऊग्णालय येथे दाखल करण्यात आले. ऊग्णालयात जाधव यांना तपासून मृत घोषित करण्यात आले. तर आशिष घडशी हा किरकोळ जखमी झाला.
दरम्यान, आपल्या ताब्यातील दुचाकी हयगयीने, वेगाने तसेच रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चालवत शैलेश जाधवला समोरून धडक देत त्याच्या दुखापतीस व मृत्यूस कारणीभूत झाल्याने आशिष घडशी याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106(2), 281, 125(अ) 125(ब) व मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करत आहेत.