For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्ञानी मनुष्य कर्म करतो पण त्याला फळाची अपेक्षा नसते

06:24 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
ज्ञानी मनुष्य कर्म करतो पण त्याला फळाची अपेक्षा नसते
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

बाप्पा म्हणतात, कर्म करणाऱ्या योग्याने स्वत: सर्व कर्मे निष्काम भावनेने करून मला अर्पण करावीत तसेच जे लोक मनात काही इच्छा धरून कर्म करताहेत त्यांना सकाम कर्म करू नका, निरपेक्ष रहा असा उपदेश योगी मंडळींनी करू नये कारण समजावून सांगण्याने सकाम कर्म करणारी मंडळी सुधारणार तर नाहीतच उलट ती जे कर्म करताहेत त्याचे फळ सोडायचंय म्हंटल्यावर ते करत असलेल्या कर्माचा त्याग करण्याचीच शक्यता अधिक आहे. अहंकारामुळे त्याला चांगलं काय, वाईट काय हे कळत नसल्याने आपण परमात्म्याहून वेगळे आहोत असे मानून ते स्वत:ला कर्ता समजत असतात. ते अविद्या व त्रिगुण ह्यांच्या आहारी गेलेले असल्याने त्यांना कर्मयोगाच्या आचरणाचे महत्त्व पटत नाही. मात्र त्यांचं बघून योगी मंडळींना आपणही सकाम कर्म करावं असा मोह होण्याची शक्यता असते हे लक्षात घेऊन, त्यांनी सदैव सावध राहून निष्काम कर्म करावं व ते मला अर्पण करावं.

ज्ञानी माणसाचे आणखीन एक वैशिष्ट्या बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत. ते म्हणतात, सत्व, रज, तम ह्या त्रिगुणांशी तसेच ह्या त्रिगुणांच्या प्रभावामुळे माणसे करत असलेल्या कर्माशी आत्म्याचा काहीएक संबंध नाही हे ज्ञानी माणसाला माहित असते. त्यामुळे तो गुणांच्या अधीन होत नाही.

Advertisement

यस्तुवेत्त्यात्मनस्तत्त्वं विभागाद्गुणकर्मणो ।

करणं विषये वृत्तमिति मत्वा न सज्जते ।।28।।

अर्थ- गुण व कर्म यांच्याहून आत्म्याचे तत्त्व भिन्न आहे हे माहीत असलेल्या व्यक्तीची इंद्रिये विषयाचे ठिकाणी त्रिगुणांच्या स्वभावाप्रमाणे प्रवृत्त होतात पण त्यांच्या कर्तृत्वापासून आपण अलग आहोत हे लक्षात घेऊन तो त्यात आसक्त होत नाही.

विवरण- अज्ञानी माणसं स्वत:ला कर्ता समजत असतात. त्यांच्या हातून झालेल्या सकाम कर्मात आपल्या प्रयत्नाने आपण यश खेचून आणलंय अशी त्यांची समजुत असते. त्यामुळे ती अहंकारी झालेली असतात. ती स्वत:ला देवापेक्षा श्रेष्ठ समजतात. त्यांच्या हे लक्षातच आलेलं नसतं की त्यांची ओळख म्हणजे देह नसून आत्मा आहे व ह्या आत्म्याचा त्रिगुणांशी तसेच ह्या त्रिगुणांच्या प्रभावामुळे जी कर्मे मनुष्य करतो त्याच्याशी काहीएक संबंध नसतो. हे लक्षात न आल्याने अशी मंडळी सत्व, रज, तम ह्या गुणांच्या आहारी जाऊन झपाटल्यागत कामं करत असतात. आपल्या आजूबाजूला अशी बरीच मंडळी आपल्या पाहण्यात असतील. त्यांच्यात त्रिगुणांच्यापैकी ज्या गुणाचे प्राबल्य असते त्यानुसार वाट्याला आलेली कर्मे ते करत असतात. उदाहरणार्थ सत्वगुणी माणूस चांगली कर्मे करत असतो पण त्याचबरोबर त्याला त्या केलेल्या चांगल्या कामाचा अहंकार होत असतो. रजोगुणी मनुष्य सतत स्वत:च्या फायद्यासाठी कर्म करत असतो त्याला चांगले, वाईट असा भेद कळत नाही. तर तमोगुणी मनुष्य हट्टी असल्याने तो करतोय तेच बरोबर आहे अशा खात्रीनं कर्म करत असतो परंतु ज्ञानी मनुष्याला आत्मा हा वरील त्रिगुणांपेक्षा वेगळा आहे हे माहीत असतं. तसेच त्या त्या वेळेस ज्या गुणाचा जोर असेल त्याप्रमाणे हातून कर्मे घडणार ह्याचीही त्याला कल्पना असते. कर्मे करणारी इंद्रिये विषयात रमतात व त्यानुसार कर्म करतात हे उघड असल्याने त्याच्याकडूनही गुणानुसार कर्मे घडतात पण तो इतरांप्रमाणे स्वत:ला कर्ता समजत नसतो. प्रारब्धानुसार त्याचे शरीर जरी कर्म करत असले तरी तो त्यात गुंतत नाही. क्रमातील आसक्ती सोडण्यासाठी त्याने प्रयत्नपूर्वक स्वत:च्या स्वभावातील रज आणि तम गुणाचे प्राबल्य कमी करून सत्वगुणाची वाढ केलेली असते. परिणामी त्याच्या हातून सात्विक कर्मे घडत असतात.

क्रमश:

Advertisement

.