एक ग्राम ‘संस्कृतमय’
संस्कृत भाषा नेहमीच्या बोलण्यासाठी उपयुक्त नसून ती एक अवघड आणि केवळ पुस्तकी भाषा आहे, असा समज कित्येकांचा आहे. पुराणकाळी ही भाषा समाजात प्रचलित होती, असे तज्ञांचे मत आहे. तथापि, सांप्रतच्या काळात ती कालबाह्या झालेली आहे, असे मानणारेही लोक आहेत. तथापि, ही समजूत बिहारमधील एका गावाने अक्षरश: खोटी ठरविली असून संस्कृत आजही अन्य प्राकृत भाषांप्रमाणे व्यवहारोपयोगी भाषा आहे, हे या गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या स्वत:च्या कित्येक दशकांपासून चालत आलेल्या वर्तणुकीतून सिद्ध केले आहे.
बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात ‘ठाडी’ नावाचे गाव आहे. या गावात 12 जातींचे लोक राहतात. ब्राम्हण कुटुंबांची संख्या मोठी असली, तरी इतर जातींची कुटुंबेही येथे बऱ्याच काळापासून वास्तव्यास आहेत. मात्र, कोणतेही जातीभेद न मानता ही सर्व कुटुंबे आणि या कुटुंबांमधील प्रत्येक व्यक्ती बोलण्यासाठी आणि एकमेकांशी संपर्क करण्यासाठी संस्कृत भाषेचाच उपयोग करते. येथील विद्यार्थीही शाळांमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये प्रथम भाषा म्हणून संस्कृतचीच निवड करतात. नवी पिढीही आपले व्यवहार संस्कृतमधूनच करते हे विशेष मानले जात आहे. या गावात दरवर्षी मार्च महिन्यात राष्ट्रीय पातळीवरची शास्त्रार्थ चर्चा आयोजित केली जाते. या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी देशभरातून संस्कृत विद्वान येथे येतात.
या गावातील वातावरण आजही पूर्णत: परंपरागत आहे. गावातील प्रत्येकाला पुरातन हिंदू संस्कृतीचा अभिमान आहे. तो अभिमान त्यांच्या चालीरीती, वेषभूषा, आहार, विहार आणि वर्तणूक यांच्यातून स्पष्ट होत असतो. या गावात जाणाऱ्या इतर गावांमधील किंवा शहरांमधील लोकांना येथील संस्कृतमय वातावरण पाहून अतीव आर्श्चय वाटते. कोणीही व्यक्ती आपली मातृभाषा ज्या सहजतेने बोलते तितक्याच सहजतेने या गावातील लोक संस्कृत भाषा बोलताना पाहून कित्येकजण आवाक् होतात. या गावाने ही संस्कृत भाषा परंपरा अनादी काळापासून जपली आहे, असे सांगण्यात येते. साहजिकच, हे गाव चर्चेचा विषय झालेले आहे.