Kolhapur News : कागलमध्ये बकरी वाहून जाणारा ट्रक उलटला; 200बकऱ्यांचा मृत्यू
व्हन्नूर येथील अपघातात बकऱ्यांचा मोठा आर्थिक नुकसान
कागल : कागल ते निढोरी राज्य मार्गावरील व्हन्नूर (ता. कागल) येथील खोत मळ्याशेजारील धोकादायक वळणावर काल पहाटे बकरीवाहू ट्रक उलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सुमारे २०० बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
राजस्थानमधून कर्नाटक राज्याच्या दिशेने हा ट्रक निघाला होता. या ट्रकमध्ये तीन वेगवेगळ्या कप्यात तब्बल २२० बकऱ्यांना दाटीवाटीने भरले होते. धोकादायक बळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यालगत उलटला आणि बकऱ्यांचा मोठा खच पडला. या अपघातात २०० बकरी चेंगरून मृत्यूमुखी पडल्या.
सुमारे २० बकऱ्या बचावल्या. सुदैवाने तीन चालक आणि क्लिनर हे चौघेही किरकोळ जखमी झाल्याने बचावले. सकाळी या मार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी ही घटना पाहिली आणि त्यांनी पोलिसांना माहितीदिली.
कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. चालकासह अपघातग्रस्त ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला. मृत बकऱ्यांची शेंदूर येथील शेतात पुरून विल्हेवाट लावण्यात आली. दरम्यान, या ठिकाणी धोकादायक वळण असल्याने आणि सध्या ऊस वाहतूक सुरू असल्यामुळे वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.