धुमाकूळ घातलेला हत्ती परतीच्या मार्गावर
वन खात्याला दिलासा : नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
बेळगाव : मागील 15 दिवसांपासून सीमाहद्दीत धुमाकूळ घातलेला हत्ती परतीच्या मार्गावर लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून सुटकेचा नि:श्वास सोडण्यात आला आहे. सीमाहद्दीतील बेकिनकेरे, अतिवाड, कौलगे परिसरात मुक्त संचार करणारा हत्ती रविवारी कालकुंद्री आणि कोवाड परिसरात निदर्शनास पडला आहे. त्यामुळे तो आता आजऱ्याच्या दिशेने मार्गस्थ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे परतीच्या मार्गावर असलेल्या हत्तीला कोणी त्रास देवू नये, असे आवाहन पाटणे येथील वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांनी केले आहे. टस्कर मागील 15 दिवसांपासून चंदगड आणि बेळगाव तालुक्यात फिरत आहे. दरम्यान शेतीचेही नुकसान झाले आहे. काही गावांमध्ये शिरुन वाहनांचेही नुकसान केले आहे. वनखात्याने पिटाळून लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तब्बल 15 ते 20 दिवस सीमाहद्दीवर या हत्तीने तळ ठोकून दहशत माजविली होती. मात्र आता सीमाहद्दीतील हत्तीने आजरा परिसराकडे मोर्चा वळविला आहे. हत्ती आजऱ्याच्या दिशेने जात असल्याने वन खात्यालाही दिलासा मिळाला आहे.
टस्कराला कोणीही रोखू नये
आजरा वन क्षेत्रातील कळपातीलच हा चाळोबा गणेश नावाचा हत्ती सैरभैर झाला आहे. तब्बल 60 ते 70 कि.मी. चा प्रवास करून तो बेळगावच्या वेशीपर्यंत येऊन पोहोचला होता. मात्र त्यानंतर बेकिनकेरे, अतिवाड, अगसगे, परिसरात स्थिरावला होता. मात्र आता सीमाहद्दीतून तो कोवाड हद्दीपर्यंत जाऊन पोहोचला आहे. रविवारी कालकुंद्री परिसरातून ताम्रपणी नदी पार करत तो कोवाडमध्ये निदर्शनास आला आहे. कोवाड येथून पुढे जाणाऱ्या टस्कराला कोणीही रोखू नये तो आपल्या मूळ आधिवासात जात आहे, अशी माहितीही वनखात्याने दिली आहे.