विद्वानांच्यापेक्षा अडाणी भक्तच अधिक श्रेष्ठ
अध्याय नववा
निर्गुण उपासना सगुण उपासनेपेक्षा श्रेष्ठ असल्याने निर्गुण उपासना करणाऱ्यांचा बाप्पा जलद उध्दार करतात. असं जरी असलं तरी, सगुण उपासना करणाऱ्यांचाही मी उध्दार करतो असं बाप्पा सांगत आहेत. सगुणोपासना पूर्ण होण्यासाठी सद्गुरुसेवा करून म्हणजे त्यांच्या शिकवणुकीनुसार वागून देहबुद्धी नष्ट करण्याचा प्रयत्न करावा असं श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात तर नामदेव महाराज त्यासाठी इष्ट देवतेचं सतत नामस्मरण व इष्ट देवतेवर अखंड प्रेम करण्यास शिकणे हा उपाय सांगतात. या उपायांनी देहभान विसरलं की, बाप्पा अशा भक्ताला आपलंसं करतात. अखंड प्रेम करणे याविषयी काही उदाहरण द्यायचं झालं तर, खूप वर्षांनी एखाद्या स्त्राrला मूल झालं तर ते मूल हेच तिचं विश्व होऊन बसतं. सतत ती त्याच्याबद्दल बोलत असते. त्याच्याशिवाय तिच्या डोक्यात दुसरा विषय नसतो. साहजिकच तिचं त्या मुलावर अतोनात प्रेम असतं आणि त्या प्रेम करण्यात कोणतीही अपेक्षा नसते. पुढील श्लोकात बाप्पा भक्ती करण्याबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा मांडत आहेत, ते म्हणतात, माझी भक्ती करण्यासाठी बुद्धिमान असण्याची गरज नाही. माझ्यावर भक्ती आणि प्रेम करणारा अडाणी असला तरी प्रत्यक्षात तो विद्वानांपेक्षा श्रेष्ठ ठरतो.
भक्तिश्चैवादरश्चात्र कारणं परमं मतम् ।
सर्वेषां विदुषां श्रेष्ठो ह्यकिंचिज्ञोऽ पि भक्तिमान् ।। 7 ।।
अर्थ-उपासनेत भक्ति आणि आदर, हेच मुख्य आहे. ज्याला काही ज्ञान नाही तो भक्तिमान् असेल तर सर्व विद्वानांपेक्षा श्रेष्ठ होय.
विवरण-बाप्पा म्हणाले, शास्त्राभ्यास करून मनुष्य ज्ञानी होऊ शकतो. त्या ज्ञानामुळे त्याला ईश्वराबाबत बरंच काही सांगता येतं पण याचा अर्थ त्याचं ईश्वरावर प्रेम असेल असं नाही. अशा माणसाचं ईश्वराबाबत बोलणं हे केवळ त्याच्या पांडित्याचं प्रदर्शन असू शकतं आणि असे लोक ठायीठायी सापडू शकतात. परंतु अशा मंडळींना ईश्वराबद्दल प्रेम नसल्याने ईश्वराला अशा पुस्तकी पंडितांचे महत्त्व वाटत नाही. असे लोक ईश्वराबद्दल बोलून सभा, संमेलने, कथा, कीर्तने गाजवतात, खूप प्रसिद्धी मिळवतात, त्याचबरोबर पुष्कळ द्रव्यही संपादन करतात. त्यामुळे त्यांना लौकिक मोठेपणा जरूर मिळतो. सर्वांच्याकडून आदर व सन्मान मिळतो पण म्हणून ते मला प्रिय होत नाहीत कारण माझ्यावर त्यांचं प्रेम असेलच असं नाही. त्यांचं प्रेम स्वत:वर, स्वत:च्या प्रसिद्धीवर, मिळणाऱ्या पैशावर व होणाऱ्या नावलौकीकवर असतं. अशांना मी कधीच वश होत नाही. गंमत म्हणजे या विद्वानांची भाषणे, कथा, कीर्तने ऐकून एखादा अडाणी मनुष्य माझ्यावर अलोट प्रेम करू लागला तर तो मला अत्यंत प्रिय होतो. लौकिक दृष्टीने तो भलेही अडाणी असेल पण माझे भजन करत असल्याने माझ्याविषयी त्याच्या मनात भक्तिभाव दाटून आलेला असतो. तो सर्वतोपरी धन्य असल्याने मला त्या विद्वानांच्यापेक्षा तो अडाणी भक्तच अधिक श्रेष्ठ वाटतो. अशा भक्तानं ईश्वराचं श्रेष्ठत्व, ईश्वराचं अविनाशित्व समजून घेतलेलं असतं. कधी एकदा ईश्वरप्राप्ती होईल असं त्याला झालेलं असतं. त्यासाठी काहीही करायची त्याची तयारी असते. अविनाशी ईश्वरप्राप्तीसाठी तो त्याचं तन, मन, धन ओवाळून टाकत असल्याने त्याला जगातल्या इतर विनाशी गोष्टींचं काहीच कौतुक वाटत नसतं. साहजिकच त्याला ईश्वराशिवाय अन्य काही दिसतंच नसतं. भक्ती, भक्तीचे नऊ प्रकार (नवविधा भक्ती), गुरु शिष्य परंपरेतून / कथांमधून जाणवणाऱ्या भक्तीचे विविध पैलू, संतांच्या कथांमधून होणारे परमात्म्याचे गुणसंकिर्तन आणि अनुषंगाने होणारी भक्तीविषयीची चर्चा यात त्याला विलक्षण रस असतो. त्यासाठी किर्तन्, नामस्मरण फार उपयोगाचे असते.
क्रमश: