तलावातील माती रस्त्यावर टाकल्याने चिखलाचे साम्राज्य
अगसगे ग्राम. पंचायतीचा अनागोंदी कारभार उघड
वार्ताहर /अगसगे
तलावातील माती गल्लीमध्ये आणून टाकल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे ग्रामस्थांना ये-जा करताना नाकीनऊ येत आहे. यामुळे पुन्हा एकदा अगसगे ग्रामपंचायतीचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे. ग्राम. पं. च्या या अनागोंदी कारभाराबद्दल ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त होत आहे चार महिन्यापूर्वी तलावातील माती आणून श्री कलमेश्वर गल्लीतील बाळू मळगली यांच्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत टाकली होती. ग्रामस्थांना रस्ता करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दोन महिने मातीचे ढिगारे तसेच पडून होते.
त्यानंतर रस्ता न करताच गल्लीमध्ये एक किलोमीटरपर्यंत केवळ माती पसरविण्यात आली. पण सध्या पावसामुळे जणू चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यावरुन नागरिकांना ये-जा करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. लहान मुले जाताना घसरून चिखलामध्ये पडत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना तर दुसऱ्या गल्लीमध्ये वाहने पार्किंग करून आपल्या घरी जाण्याची वेळ आली आहे. याविषयी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व पीडीओ यांच्याकडे विचारणा केली असता थातूरमातूर उत्तरे मिळत आहेत. तरी ग्रामपंचायतीने चिखल बाजूला करून रस्ता वाहतुकीला सुरळीत करून द्यावा अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.