सौदी अरेबियामध्ये मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेला अब्दुल रहीम नावाचा एक इसम २० वर्षांनंतर बकरीदसाठी घरी परतला सगळेच त्याला पाहून भावूक झाले. पोटासाठी गाव सोडलेल्या माणसांच्या वाट्याला किती संघर्ष येऊ शकतो याचेच हे उदाहरण . अब्दुल रहीम गेली २० वर्षे सौदीच्या तुरुंगात शिक्षा भोगत होते.
लोकांनी क्राउडफंडिंगद्वारे 'ब्लड मनी'साठी ३४ कोटी रुपये जमा केले, त्यानंतरच त्यांना अखेर मृत्युदंडाच्या शिक्षेतून दिलासा मिळाला. केरळमध्ये परतल्यावर रहीम भावूक झाले आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले. दारात उभ्या असलेल्या आपल्या आईला त्याने मिठी मारली आणि ते रडला. दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते.
नेमका गुन्हा काय होता?
आपल्या कुटुंबाला आधार देण्याच्या आशेने रहीम नोव्हेंबर २००६ मध्ये सौदी अरेबियाला गेला. रियाधमध्ये पोहोचल्यानंतर काही आठवड्यांतच त्याच्या आयुष्याने एक दुःखद वळण घेतले.
सुरुवातीला रहीम यांना एक काम मिळाले. ते होते एका सौदी कुटुंबातील दिव्यांग मुलगा, अनस अल फायिस, याची काळजी घेण्याचं. पण दुर्दैवाने एके दिवशी कार प्रवासादरम्यान, रहीमच्या हातून चुकून अनसच्या जीवनरक्षक प्रणालीतील एक नळी तुटली. काही क्षणांतच गुदमरून त्या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
चुकून झालेल्या गोष्टीची जबर शिक्षा
जरी रहीमने दावा केला की हा एक अपघात होता, हेतुपुरस्सर केलेले कृत्य नव्हते, तरीही त्याला डिसेंबर २००६ मध्ये अटक करण्यात आली आणि २०१२ मध्ये सौदी न्यायालयाने त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. यामुळे जगभरातील मल्याळी लोकांमध्ये सर्वात मोठ्या मानवतावादी मोहिमांपैकी एक सुरू झाली.
जेव्हा मुलाच्या कुटुंबाने अखेरीस 'ब्लड मनी'च्या (रक्तदात्याच्या मोबदल्यात) बदल्यात रहीमला माफ करण्यास सहमती दर्शवली, तेव्हा 'अब्दुल रहीम कायदेशीर मदत समिती'च्या माध्यमातून जगभरातील मल्याळी लोकांनी ३४ कोटी रुपये जमा केले.
सगळ्यांचे प्रयत्न आणि रहिमची सुटका
सामूहिक प्रयत्नांमुळे रहीमचा जीवनासाठीचा अशक्य वाटणारा लढा आशा आणि करुणेच्या कहाणीत बदलला. जुलै २०२४ मध्ये त्याची मृत्युदंडाची शिक्षा अधिकृतपणे रद्द करण्यात आली. तथापि, सौदी अरेबियाच्या सार्वजनिक हक्क कायद्यानुसार, सुटका होण्यापूर्वी त्याला २० वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार होता. ही प्रतीक्षा अखेर या आठवड्यात संपली.