तांत्रिक चुका झालेल्या बहिणींच्या निधीवर गदा ?
मुंबई , प्रतिनिधी :
अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींचा सनमाननिधी बंद झालाच, पण आता पात्र असूनही केवायसी भरताना तांत्रिक चुका झालेल्या लाडक्या बहिणींचा सन्मान निधीही बंद होण्याची शक्यता आहे. राज्यातील ज्या कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरील ताण प्रचंड वाढला आहे. सरकारने ही योजना चालू करताना काही अटी घातल्या होत्या, मात्र काही महिला या निकषानुसार पात्र नसताना देखील योजनेचा लाभ घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर पात्र नसताना देखील लाभ घेण्राया काही महिलांना या योजनेतून वगळण्यात आले.
दरम्यान लाभार्थी महिलांनी सरकारच्या निर्देशानुसार 31 डिसेंबर 2025 पूर्वी आपली केवायसी पूर्ण केली, मात्र यातील अनेक महिला पात्र असूनही आणि त्यांनी केवायसी करून देखील त्या या योजनेसाठी अपात्र ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या महिलांनी या योजनेसाठी केवायसी केली, त्यातील अनेक पात्र महिलांच्या नावापुढे चुकीने शासकीय कर्मचारी असा उल्लेख करण्यात आल्याने त्यांचे अनुदान आता बंद झाले, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या महिलांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच काही महिलांकडून केवायसी करताना तांत्रिक चुका झाल्याने त्यांची नावेदेखील या योजनेतून वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे. ज्या महिलांचे आर्थिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आढळून आले, तसेच ज्यांच्याकडे वाहन आहेत, अशा महिलांची नावे देखील या योजनेतून वगळण्यात आली आहेत.