For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापुरात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव

10:52 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापुरात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव
Advertisement

शेकडो जणांना लागण : नगरपंचायतीचे स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष : शासकीय रुग्णालयातच उपचार घेण्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन

Advertisement

खानापूर : शहरात डासांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढल्याने शहरात डेंग्यूची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. शहरात डेंग्यूचा फैलाव झाल्याचे शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले असून याकडे खानापूर आरोग्य खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. आरोग्य सेविकांकडून शहरात कोणत्याही प्रकारची सेवा देण्यात येत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. तसेच नगरपंचायतीने स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेकडो रुग्ण या डेंग्यूच्या आजाराने त्रस्त आहेत. शहरात डेंग्यू रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाली असून सर्वच गल्ल्यातून मोठ्या प्रमाणात या रोगाचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव वाढला असून याकडे नगरपंचायतीने साफ दुर्लक्ष केले आहे. डासांच्या निर्मूलनासाठी गेल्या काही महिन्यापासून कोणतीही उपाययोजना केली नाही. नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे अनेक साथींच्या आजाराची लागण होत आहे.  गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाला सुरवात झाली असून, अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात डास तयार होत आहेत. यासाठी नगरपंचायतीनें डास निर्मूलनासाठी औषध फवारणी तसेच फॉगिंग मशिनने डास निर्मूलनासाठी फवारणी करणे गरजेचे आहे.

डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज  

Advertisement

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी महेश किडसन्नावर यांना विचारले असता, शहरासाठी आरोग्य तपासणी अधिकारी नसल्याने नगरपंचायतीच्या आरोग्य विभागानेच याबाबत शहरात स्वच्छता राखणे गरजेचे आहे. डेंग्यूच्या साथीचा रोगाचा फैलाव झाल्याचे निदर्शनास आल्यावर आम्ही आमच्या नर्सिंग स्टॉफकडून सर्वेक्षण हाती घेण्यात येईल. तसेच डेंग्यूच्या रुग्णानी खासगी उपचार न घेता सरकारी दवाखान्यात उपचार करून घ्यावेत, रक्त तपासणी तसेच सर्व साथीच्या रोगावर शासकीय रुग्णालयात उत्तम प्रकारे उपचार केले जातील, यासाठी नागरिकांनी डेंग्यूच्या रोगावर सरकारी दवाखान्यात योग्य उपचार करुन घ्यावेत. डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. डेंग्यू रोगाबाबत आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे तसेच घरातील वापरणारे पाणी वेळोवेळी बदलत राहणे, हीच खबरदारी घेणे असे ते म्हणाले.

ग्रा. पं. ने स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज

पावसाळ्यात कावीळ, डेंग्यू व मलेरिया होऊ नये यासाठी दक्षता घेण्यासाठी ग्रा. पं. ने स्वच्छता मोहीम राबवून डुकरे पकडणे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, तण नाशक फवारणी करणे, डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फाँगिंग मशिनने फवारणी करणे, गावात अद्यापही असलेली कचऱ्याचे ठिकाणे स्वच्छ करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने डासांचा त्रास वाढत आहे. गेल्या काही दिवसापासून डेग्यू ऊग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आता प्रशासनानेच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी गावातील गटारींची स्वच्छता करणे गरजेचे होते. शहरातील गटारी अद्याप स्वच्छता करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे आता पावसाचे पाणी गटारीत अडकून डासांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. यासाठी नगरपंचायतीने शहरातील स्वच्छतेकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. नगरपंचायतीकडे फॉगिंग मशीन नसल्याने डासांच्या निर्मूलनासाठी फक्त पंपाद्वारे औषध फवारणी करण्यात येत आहे. शहराची व्याप्ती पाहता औषध फवारणी करून डासांचे निर्मूलन होऊ शकणार नाही. यासाठी फॉगिंग मशीन्स व अन्य उपाययोजना करून डासांचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणे गरजेचे आहे.

नागरिकांनीही खबरदारी घेण्याची आवश्यकता

याबाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट म्हणाले, येत्या दोन दिवसात फॉगिंग मशीन्सद्वारे शहरात डास निर्मूलनासाठी क्रम घेण्यात येईल, तसेच स्वच्छतेसाठी योग्य नियोजन करून गटारीत पाणी साचणार नाही, याची खबरदारी घेती जाणार आहे. असे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनीही याबाबत खबरदारी घ्यावी आणि आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा. कुठेही पावसाचे पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.

- मुख्याधिकारी संतोष कुरबेट

Advertisement
Tags :

.