उच्चभ्रू वस्तीतील ‘भूतबंगला’
आपल्या देशाची राजधानी दिल्ली ही ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. या वास्तू पाहण्यासाठी असंख्य पर्यटक येथे येत असतात. तथापि, या शहराच्या अत्यंत उच्चभू वस्तीत, जेथे मंत्र्यांची निवासस्थानेही आहेत, तेथे एक वास्तू ‘भूतबंगला’ म्हणून ओळखली जाते. हा भूतबंगला इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक आणि सीपी या अत्यंत सुरक्षित भागात आहे. या भागात 520 वास्तू आहेत. या वास्तूंमध्ये या भूतबंगल्याचे अस्तित्व अनेक शतकांपासून आहे.
दिल्लीच्या या गजबजलेल्या भागात ही वास्तू मात्र अतिशय शांत असते. वास्तविक प्रतिदिन अनेक लोक या वास्तूला पाहण्यासाठी येतात. पण भूतबंगला अशी ख्याती या वास्तूने प्राप्त केल्याने पर्यटकही येथे आल्यानंतर कमालीची शांतता पाळताना दिसतात. खरे तर ते मनातून घाबरलेलेच असतात पण तरीही हा भूतबंगला आतून पाहण्याची अतीव उत्सुकता त्यांना स्वस्थ बसू देत नाही. या वास्तूच्या संदर्भात अनेक दंतकथा आणि भयकथाही लोकप्रिय आहेत.
ही वास्तूची निर्मिती आणि लोदी काळातील स्थापत्यशास्त्रानुसार झाली आहे. येथे एक विहीर असून तिच्या 106 पायऱ्या आहेत. त्यांच्यापैकी 46 पायऱ्या नेहमी पाण्यात बुडालेल्या असल्याने त्या दिसत नाहीत. या विहिरीचे पाणी काळ्या रंगाचे दिसते. त्यामुळे ते पिण्यासाठी कोणी उपयोगात आणत नाहीत. या वास्तूला इतके महत्व का दिले जाते, याचे कारण तेथील वातावरणात दडलेले आहे. या भागातील इतर वास्तू अत्याधुनिक असून नेहमी झगमगत असतात. तथापि, ही वास्तू मात्र भयाण, शांत आणि गूढ अशी आहे. कित्येक शतकांमध्ये या वास्तूत कोणीही वास्तव्य केलेले नाही. तसेच कोणी तसा प्रयत्न केला तर त्याला भलभलते अनुभव येतात, अशी वदंता आहे. या भयाणतेचा लाभ असा की ही वास्तू बळकाविण्याचा प्रयत्नही कोणी केला नाही. परिणामी ती तिच्या मूळ स्वरुपात आजही आहे.