जीर्ण झालेल्या घरामुळे शेजारील कुटुंबीयांना धोका
जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांना निवेदन
बेळगाव : ग्रामीण भागातील जुन्या घरांमध्ये नागरिक वास्तव्यास नसल्याने सदर घरांचा धोका शेजाऱ्यांना निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार देऊनही दखल घेण्यात आली नाही. यामुळे आपल्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. यावर उपाययोजना राबवण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन बाळेकुंद्री के. एच. येथील युवराज पाटील यांच्यातर्फे जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांना देण्यात आले.
पाटील गल्ली, बाळेकुंद्री के. एच. येथील शशिकांत पाटील हे आपले जुने घर सोडून नव्या घरामध्ये वास्तव्यास गेले आहेत. त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून हे घर बेवारस आहे. घरामध्ये कोणीच नसल्याने घराच्या भिंती व कौले ढासळली आहेत. सदर घर आता पूर्णपणे जीर्ण झाले आहे. त्यामुळे घरांच्या भिंती कोसळण्याची दाट शक्यता आहे. येथूनच दररोज ये-जा करावी लागते. याचा धोका आपल्या कुटुंबीयाला निर्माण झाला असून ग्रा. पं. ने त्वरित दखल घेऊन जीर्ण घर जमीनदोस्त करावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ग्रा. पं. ने कोणतीच दखल घेतली नाही.