For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नंदनवनावर काळी छाया

06:27 AM Apr 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
नंदनवनावर काळी छाया
Advertisement

पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये निष्पाप 28 पर्यटकांचा मृत्यू झाला असून देशभर याबाबत शोक पाळला जात आहे. पर्यटनातले नंदनवन म्हणून जम्मू काश्मीरकडे पाहिले जाते. गेल्या दोन तीन वर्षांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या जोमाने वाढलेली दिसून आली. 2024 मध्ये तब्बल 2 कोटी 35 लाख पर्यटकांनी जम्मू काश्मीरला भेट दिली होती. ज्यामध्ये 65452 पर्यटक हे विदेशी पर्यटक होते.

Advertisement

गेल्या कित्येक वर्षापासून जम्मू काश्मीर हे पर्यटकांसाठी महत्त्वाचे पर्यटनस्थळ ठरले होते. 2021 पासून पर्यटकांची संख्या 1 कोटीचा आकडा पार करू शकली आहे. 2023 मध्येही दोन कोटीपेक्षा अधिक पर्यटकांनी या नंदनवनाला भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटला होता. वैष्णो देवी, श्रीनगरमधील डल झिल, शंकराचार्य मंदिर, ट्यूलिप गार्डन, पहलगाममधील अनंतनाग, काश्मीर घाटीतील अमनाथ यात्रा, गुलमर्गमधील ठिकाणे अशा विविध पर्यटन स्थळांना पर्यटक जम्मू काश्मीरला भेट देतात, तेव्हा आवर्जुन जात असतात. 22 एप्रिलला झालेल्या घटनेनंतर जम्मू काश्मीरमधील पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे.

सुरक्षेसंदर्भातील झालेल्या चुकीमुळे पर्यटकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. सरकारने ही बाब गंभीरपणाने घेत याबाबत उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी 22 एप्रिल रोजी गोळीबाराची दुर्घटना घडली. त्याठिकाणी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली नव्हती. सदरचे ठिकाण हे अलीकडेच पर्यटकांसाठी खुले करण्यात आले होते, अशीही माहिती पुढे येते आहे.

Advertisement

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जम्मू काश्मीरने 2.30 लाख कोटींच्या जीडीपीमध्ये पर्यटन क्षेत्राचे योगदान 16100 ते 18400 कोटी रुपयांचे होते. यामध्ये एकट्या हॉटेल व्यवसायाचा वाटा 6900 कोटी रुपयांवर होता. 2019 मध्ये पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतरच्या परिस्थितीनुसार पाहता येत्या काळात येथील व्यवसायामध्ये 30 ते 35 टक्क्यांची घसरण होऊ शकते, असे म्हटले जात आहे. राज्याच्या जीडीपीमध्ये पर्यटन क्षेत्राचा वाटा 8 टक्के इतका आहे. गेल्या तीन वर्षामध्ये जम्मू काश्मीरची अर्थव्यवस्था राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेमध्ये चांगली कामगिरी करताना दिसते आहे.

22 एप्रिलच्या हल्ल्यानंतर पहलगाममध्ये 20 हजार हॉटेल्समधून जवळपास 90 टक्के इतक्या खोल्या सध्याला रिकाम्या झाल्या आहेत. ज्या पर्यटकांनी आगाऊ बुकिंग केले होते, त्यांनीही आता बुकिंग रद्दसाठी फोन करण्यास सुरुवात केली आहे. पहलगामशिवाय सोनमर्ग, गुलमर्ग यासारख्या पर्यटन क्षेत्रावर असणाऱ्या पर्यटकांनी परतीची वाट धरली आहे. सरकारी पातळीवर या पर्यटकांना परत पाठविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जात आहे. 2024 मध्ये विदेशी पर्यटकांची संख्या कमालीची वाढलेली पहायला मिळाली. 2023 च्या तुलनेमध्ये यांची संख्या दुप्पट झालेली दिसून आली. 37000 विदेशी पर्यटकांनी 2023 मध्ये जम्मू काश्मीरला भेट दिली होती. या तुलनेमध्ये मागच्या वर्षी ही संख्या 65 ते 67 हजारवर पोहोचली आहे. याचाच अर्थ विदेशी पर्यटकांचा ओढाही देशाच्या नंदनवनाकडे ओढला गेल्याचे स्पष्ट झाले होते. हीच बाब हेरुन अतिरेक्यांनी सदरचा हल्ला करत जम्मू काश्मीरच्या पर्यटन उद्योगावरच घाला घालण्याचे काम केले आहे. हा हल्ला जम्मू काश्मीरमध्ये झालेला असला तरी संपूर्ण भारतात महत्त्वाच्या शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनाला बहर आलेला असताना अचानक झालेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा जम्मू काश्मीरबाबत भारतीयांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अर्थात हे वातावरण दीर्घकाळ नसेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे सांगितलेले असून येणाऱ्या कालावधीत भारत कोणती कारवाई करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. दरम्यान गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पाकिस्तानला धडा शिकविण्याबाबत सर्वांचेच एकमत झालेले असून सरकारला आता कारवाईबाबत निर्णय घेणे सोपे जाणार आहे. जम्मू काश्मीर क्षेत्रामध्ये असणाऱ्या हॉटेल उद्योगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान येत्या काळात होणार आहे. 5,500 हून अधिक छोटी मोठी हॉटेल्स येथे कार्यरत आहेत. यामध्ये 55 फाईव्हस्टार, 150 फोरस्टार हॉटेल्स आहेत. वर्षाला या हॉटेल उद्योगाच्या माध्यमातून राज्याच्या खजिन्यामध्ये 6900 ते 9200 कोटी रुपये घातले जात असतात. या उत्पन्नावर येत्या काळात परिणाम दिसून येणार आहे. सरकारने हल्ल्याची बाब गंभीरतेने घेतली असून विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याला सुरुवात केली आहे. जम्मू काश्मीर सध्याला तरी काही महिन्यांसाठी पर्यटकांविना शांत असणार आहे. तेव्हा सरकार येत्या काळात हे वातावरण बदलण्यासाठी आवश्यक ते उपक्रम घेईल हे नक्की! जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट असतानाच्या कालावधीत कोणतीही हल्ल्याची अप्रिय घटना घडली नव्हती. मात्र राज्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार आल्यानंतर राज्यात ही घटना घडली आहे. निष्पाप पर्यटकांना धर्म विचारुन केलेला हल्ला आणि त्यांचे घेतलेले प्राण दुर्देवी असून सरकार याबाबतीत कोणते कडक पाऊल उचलते हे पाहावे लागेल. पण सध्या तरी जम्मू काश्मीर या पाकिस्तानला लागून असणाऱ्या राज्यासह पंजाबातही आपली सुरक्षा व्यवस्था कडक करावी लागणार आहे. सुरक्षेतील चुक किती महागात पडू शकते, हे पहलगामच्या घटनेने दाखवून दिले आहे.

-दीपक कश्यप

Advertisement
Tags :

.