विषारी दारू प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी
राज्यपालांची भेट घेत भाजपने केली मागणी : स्टॅलिन सरकार लक्ष्य
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूच्या कल्लाकुरिची येथे विषारी दारूच्या प्राशनामुळे आतापर्यंत 57 जणांनी जीव गमावला आहे. तर 156 हून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर याप्रकरणी सत्तारुढ द्रमुक विरोधात भाजप तसेच अण्णाद्रमुकडून निदर्शने केली जात आहेत. याचनुसार भाजपच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल आर.एन. रवि यांची भेट घेतली. भाजप प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने राज्यपालांकडे याप्रकरणी सीबीआय चौकशी करविण्याची मागणी केली आहे.
विषारी दारूमुळे 60 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा अण्णामलाई यांनी केला आहे. मुख्यंमत्री एम.के. स्टॅलिन यांचे सरकार या विषारी दारू प्रकरणासाठी जबाबदार आहे. तर उत्पादनशुल्क मंत्री एस. मुथुसामी यांना तत्काळ पदावरून हटविण्याचा निर्देश राज्यपालांनी द्यावा. द्रमुक सरकारने मानील तीन वर्षांमध्ये राज्यात अमली पदार्थ तस्करी तसेच विषारी दारूची निर्मिती रोखण्यासाठी काहीच केले नसल्याचा दावा अण्णामलाई यांनी केला आहे. भाजपच्या शिष्टमंडळात अण्णामलाई यांच्यासोबत भाजप नेत्या तमिळसाई सुंदरराजन देखील सामील होत्या.
अण्णाद्रमुककडून निदर्शने
विषारी दारूमुळे अनेकांचा बळी गेल्याप्रकरणी अण्णाद्रमुकने कल्लाकुरिची जिल्ह्यात सत्तारुढ द्रमुक विरोधात निदर्शने केली. या निदर्शनांचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री एडप्पादी पलानिसामी यांनी केले आहे. कल्लाकुरिची जिल्ह्यातील सलेम मुख्या मार्गावर निदर्शने करत पलानिसामी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. याप्रकरणी जबाबदारी स्वीकारत स्टॅलिन यांनी राजीनामा देण्याची गरज आहे. विषारी दारू प्रकरणात द्रमुकच्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप पलानिसामी यांनी केला आहे.