बांगलादेशमधून परतले 978 भारतीय विद्यार्थी
नवी दिल्ली : बांगला देश सरकारच्या आरक्षण धोरणाच्या विरोधात त्या देशात उग्र आंदोलन होत असून मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे. त्यामुळे तेथे असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परतण्याची सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. या सूचनेला प्रतिसाद देऊन आतापर्यंत 978 विद्यार्थी सुखरुपरित्या भारतात परतले आहेत, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने शनिवारी दिली. बांगला देशमधील भारतीय उच्चायोग तेथील प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहे. त्या देशातील सर्व भारतीय सुरक्षित रहावेत आणि त्यांना तेथे होत असलेल्या हिंसाचाराची झळ पोहचू नये, यासाठी उच्चायोगाकडून प्रयत्न केले जात आहेत.
बांगला देशात हजाराहून अधिक भारतीय विद्यार्थी असल्याची अनधिकृत माहिती आहे. आतापर्यंत 978 विद्यार्थी परतले आहेत. त्यांच्यापैकी 200 विद्यार्थी विमानाने, तर अन्य विद्यार्थी सीमारेषेवरील विविध प्रवेशद्वारांच्या माध्यमातून भारतात परतले आहेत. सध्या बांगला देशात भारताचे 15 हजारांहून अधिक नागरीक पर्यटन किंवा व्यवसायासाठी गेलेले आहेत. त्या सर्वांना त्वरित भारतात परतण्याची सूचना करण्यात आली असून त्यांच्या आगमनावर लक्ष ठेवले जात आहे. चितगाव, राजशाही, सिल्हेत आणि खुलना येथील भारतीय उच्चायोगाच्या शाखांनाही संदेश देण्यात आला असून त्यांच्या विभागांमधील भारतीयांच्या सुरक्षेसंबंधी दक्ष राहण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.