दापोली लोकवस्तीत ९५५ माकडे 'पिंजराबंद'
दापोली :
तालुक्यात २०२४-२५ आर्थिक वर्षात ९५५ माकडांना वन प्रशासनाच्या तज्ज्ञ पथकाकडून ताब्यात घेवून त्यांना मूळ अधिवासात मुक्त करण्यात आले. यामुळे बागायतदारांतून समाधान व्यक्त होत आहे.
वानर व माकडे शेती, फळझाडांचे नुकसान करत असल्याने शेतकरी, बागायतदार त्रस्त झाले आहेत. त्यामुळे माकडांना ताब्यात घेवून दूर नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी होत होती. त्या अनुषंगाने वनप्रशासनाकडून माकडांना ताब्यात घेण्याची मोहीम राबवण्यात आली. यात २०२४-२५ आर्थिक वर्षात ९५५ माकडांना ताब्यात घेण्यात आले.
दापोली वनपरीक्षेत्र अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल रामदास खोत, वनरक्षक हे या मोहिमेत सहभागी होत लोकवस्तीत उपद्रव करणारी माकडे ताब्यात घेण्यासाठी पिंजरे लावून त्यांना मूळ अधिवासात सोडण्याची कार्यवाही करत आहेत. त्यात जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याने ही मोहीम अजून काही महिने राबवण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार ही मोहीम राबवली जात असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
आतापर्यंत मौजे आंबवली ब्रू भडवळे, अडखळ, शिवाजीनगर-किरांबा, केळशी, उटंबर, आसूद, रोवले, आडे, लोणवडी, दापोली अर्बन बँक महाविद्यालय परिसर, जालगाव, शिर्दे, खेर्डी, बोंडीवली, मौजेदापोली, सारंग मोहल्ला, कळंबट, पालगड, सोंडेघर, बांधतिवरे, कुडावळे गावांमध्ये पिंजरे लावण्यात आले आहेत.