‘सह्याद्री’ साठी आणखी 91 अर्ज दाखल
कराड :
यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सुमारे 91 उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर एकूण 94 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून बुधवार 5 रोजी उमेदवारी अर्ज दाखल होण्याचा अंतिम दिवस आहे.
सोमवारी कारखान्याचे अध्यक्ष, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. मंगळवारी सुमारे 91 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मोठ्या प्रमाणात उमेदवार अर्ज दाखल करण्यास आल्याने छत्रपती संभाजी मार्केटमधील निवडणूक शाखेच्या कार्यालयाला गर्दीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मंगळवारी दाखल झालेल्या अर्जामध्ये एक नंबर गटात आज 5 एकुण 7, गट क्रमांक 2 मध्ये 9, गट क्रमांक 3 मध्ये 8, गट क्रमांक 4 मध्ये 21, गट क्रमांक 5 मध्ये 13 आा†ण आजअखेर 14, गट क्रमांक 6 मध्ये 18, मा†हला गटात 5, राखीव गटात 12 असे 91 उमेदवारी अर्ज आज दाखल झाले. आजपर्यंत 94 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवार 5 रोजी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने जास्त प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. गुरूवार 6 रोजी छाननी होणार आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार मनोज घोरपडे हे समर्थक उमेदवारांसह उपस्थित होते. त्यांच्या समर्थकांनीही आपले अर्ज दाखल केले. तर काँग्रेसचे निवास थोरात यांनीही आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवास थोरात यांनीही विरोधी पॅनेलचे चित्र 7 तारखेला स्पष्ट होईल, असे सांगितले.
- समविचारी मंडळींना एकत्र करून निवडणूक लढवणार-आमदार घोरपडे
पत्रकारांशी बोलताना आमदार मनोज घोरपडे म्हणाले की, आम्ही आज अनेक उमेदवारांचे अर्ज भरले आहेत. निवडणुकीबाबत दिशाभूल केली जात होती. मात्र कारखाना निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच विरोधकांनी मोठ्या संख्येने अर्ज भरले आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा चेअरमन, व्हाइस चेअरमन करण्याचा निर्णय कारखान्याच्या सभासदांनी घेतला आहे. कारखान्याचे विस्तारीकरण चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. याबाबत सभांमध्ये आम्ही अधिक भाष्य करू. पाच तालुक्यातील समविचारी मंडळींना एकत्र करून निवडणूक लढवण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण यांचा सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा मंत्र आम्ही पाळणार असून आमच्या कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवणार नाही. निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर आम्ही या कारखान्याचे पालकत्व घेणार आहोत.